Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 23 February, 2009

पाकला"जशास तसे'उत्तर का दिले नाही?

मुंबई हल्लाप्रकरणी सरकारवर ठपका
मडगाव, दि.२२ (प्रतिनिधी) - मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हे पाकिस्तानने भारताविरुद्ध पुकारलेले युध्दच होते, त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्याचे सोडून आपले सरकार मदतीसाठी धावा करीत अमेरिकेकडे धावले, अशा भेकडांच्या हाती पुन्हा राज्यकारभार द्यावयाचा की काय याचा गांभीर्याने विचार या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने जनतेने करायला हवा असा सल्ला देताना या प्रकरणी " ईटका जवाब पत्थरसेही देनेका' (जशास तसे)अशी भाजपची स्पष्ट भूमिका आहे कारण अशा लोकांना दुसरी भाषा कळत नाही, आपण ते गुजरातमध्ये करून दाखविले असे सुस्पष्ट प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
येथील कॉश्ता मैदानावर दक्षिण गोव्यातील भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केंद्रातील संपुआ सरकारवर त्यांची चौफेर हल्ला केला व सांगितले की या सरकारने दहशतवादाचा कर्दनकाळ ठरलेला "पोटा' कायदा मागे घेण्याखेरीज दुसरे काहीच केलेले नाही. आज गुजरात वगळता साऱ्या देशभर जो दहशतवाद बोकाळलेला आहे त्याचे कारण सरकारमध्ये नसलेली धमक व मागे घेतलेला पोटा होय. गुजरातमध्ये दहशतवादी कृत्य झाल्यावर आपल्या सरकारने त्याच्याशी संबंधित सर्व दहशतवाद्यांना लगेच जेरबंद केले व त्यातून देशभरातील सुरक्षादलांमध्ये चर्चा सुरू झाली होती याचा किस्सा त्यांनी सांगितला. कॉंग्रेस सरकारे ते करू शकत नाहीत कारण त्यांना देशाच्या अखंडता व सुरक्षेपेक्षाही मतपेटीची जास्त चिंता असते.
केंद्राच्या गहू आयात निर्णयावर टीका करताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवरच आरोप ठेवला व वाजपेयींच्या राजवटीत ज्या देशात धान्याची कोठारे भरून वाहत होती, धान्य साठवायला जागा पुरत नव्हती त्या देशावर आज गहू आयात करण्याची पाळी का यावी असा सवाल केला व तो करताना स्वदेशांतील शेतकऱ्यांकडून ८००रु. क्विंटल तर बाहेरील देशांतून खरिदलेल्या गव्हाला रु.१६०० क्विंटल असा दर का दिला गेला,या व्यवहारातील दिल्लीतील दलाल कोण ते जाहीर करण्याची मागणी केली.
सरकारच्या अशा या दिशाहीन धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या करतात. महाराष्ट्र,आंध्र प्रदेश या कॉंग्रेसप्रणीत राज्यात ते प्रकार चालू आहेत पण अभिमानाची गोष्ट म्हणजे गुजरातेत अजून एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही . तेथे २००२ मध्ये २३ लाख गासड्या कापूस पिकला होता, तर यंदा ते प्रमाण १.२३ कोटी वर गेले आहे. तेथील ८० टक्के कापूस चीन व जपानात निर्यात होतो व तसा तो व्हावा याची खबरदारी सरकार घेते, ते म्हणाले.
त्यांनी नुकतेच लोकसभेत सादर केला गेलेला अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचे प्रतिपादिले. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिलेल्या आकडेवारीवरून सरकारने गेली पाच वर्षे देशाला फसविण्याखेरीज दुसरे काहीच केलेले नाही हे दिसून येते असे सांगितले. जागतिक आर्थिक मंदीमुळे आत्तापर्यंत ५ लाख तरुण बेकार झालेले आहेत व हे प्रमाण चालूच राहणार आहे ही मुखर्जी यांची कबुली म्हणजे सरकारचा एकप्रकारे नालायकपणा असून, सरकारने काहीच केलेले नाही याचा पुरावा आहे असे सांगून ते म्हणाले, आपण त्या उलट गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय गुजरात विकास शिखर परिषद बोलावली, तिला ५० देशांतील प्रतिनिधी सहभागी झाले व त्यातून १२ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणूक विषयक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यातून राज्यात २५लाख रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत,जे गुजरातला शक्य झाले ते केंद्राला का शक्य होऊ नये असा सवाल त्यांनी केला व याचा खुलासा कॉंग्रेसकडे मागा असे आवाहन केले.
येत्या निवडणुकीत देशातील जनताच या लोकांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असे सांगून अडवाणी प्रधानमंत्री व्हावेत ही वाजपेयींची इच्छा आहे, ती साकार करण्यासाठी भाजपला सत्तास्थानी न्या व त्यासाठी गोव्यातील दोन्ही जागा भाजपच्या पारड्यात टाका,असे आवाहन त्यांनी केले.

No comments: