Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 27 February, 2009

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

कदंब कर्मचाऱ्यांचा निर्धार

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - सहावा वेतन आयोग कंदब कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भात अजून कोणताही निर्णय झाला नसून २ मार्चपर्यंत त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. तथापि, आपल्या मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत कालपासून सुरू केलेले धरणे आंदोलन यापुढेही असेच सुरू ठेवण्याचा निर्धार कदंब कर्मचारी संघटनेने घेतला आहे.
येथील "श्रमशक्ती भवना'त आज दुपारी कामगार आयुक्त व्ही. बी. एन. रायकर यांच्यासोबत कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. नाईक यांची बैठक पार पडली. या बैठकीत महामंडळाचे कार्मिक (पर्सोनेल) व्यवस्थापक टी. के. पावसे, "आयटक'चे मुख्य सचिव ख्रिस्तोफर फोन्सेका, सचिव राजू मंगेशकर, कदंब चालक आणि वाहक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्योकिम फर्नांडिस, उपाध्यक्ष गजानन नाईक याच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी मिळून एकूण ४१ जण उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सूचनेनुसार महामंडळाचे संचालक व वित्त सचिव यांची बैठक पार पडली. यामध्ये अद्याप कोणताही निर्णय झाला नसून येत्या २ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे.
संघटनेने मात्र आज सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवले असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकार विनाकारण विलंब करत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी आज सरकारच्या विरोधात निदर्शने करत घोषणा दिल्या. यामध्ये महामंडळाचे सुमारे ७०० कर्मचारी सहभागी झाले होते.

No comments: