Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 23 February, 2009

धनदांडग्या कॉंग्रेसला सत्ताभ्रष्ट करा




घणाघाती भाषणात नरेंद्र मोदी यांचे आवाहन
म्हापसा, दि. २२ (प्रतिनिधी) -कॉंग्रेसकडे धनबळ व सत्ताबळ आहे, याचा वापर करून या धनदांडग्यांनी ६० वर्षे सत्ता भोगली. हा पक्ष सत्ताभ्रष्ट करण्याची वेळ आता आली आहे. कॉंग्रेसच्या धनशक्तीला भाजपची संघटनशक्ती हेच उत्तर आहे. भाजपची संघटनशक्ती, कार्यकर्त्यांवर विश्वास, सत्तेचा अथवा सत्तेच्या बळाचा गैरवापर न करणे, देशाची अखंडता व सुरक्षितता राखणे या मुद्यांमुळे "पार्टी वुईथ डिफरन्स' म्हणून भाजप देशात ओळखली जाते, असे प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी म्हापशाच्या बुथ कार्यकर्त्यांच्या संमेलनात केले.
आपल्या दीड तासाच्या भाषणात गुजरात राज्याचा विकास, निवडणूक शास्त्र,देशाची सुरक्षा,कॉंग्रेसचे बोटचेपे धोरण यावर मोदी यांनी घणाघाती प्रहार करून कार्यकर्त्यांमध्येे विश्वासाची लाट निर्माण केली.
कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी निवडणुकीचे शास्त्र सांगताना निवडणूक कशी जिंकता येते, याबाबत कार्यकर्त्यांकडे संवाद साधला. निवडणूक केवळ धनाने जिंकता येते अशा भ्रमात कॉंग्रेस पक्ष आहे. त्याविरुद्ध लढाई जिंकण्यासाठी संघटन शक्ती, आत्मविश्वास, देशाची एकता व सुरक्षा याला प्रथम प्राधान्य देणारा भाजप ठामपणे उभा आहे. बूथ हा पक्षाचा किल्ला आहे व या किल्ल्याचे सरदार मजबूत असतील तर निवडणूक जिंकता येते. आपण प्रत्येक बूथ जिंकला तरच पार्टी वुईथ डिफरन्स म्हणून आपण म्हणवून घेऊ शकतो. आपला पक्ष "दल से बडा देश' यावर जास्त विश्वास ठेवणारा पक्ष आहे. आपण कार्यकर्ता म्हणून आपल्यासमोर उभा आहे, गुजरात राज्याचा मुख्यमंत्री म्हणून नाही, असे सांगून त्यांनी सभेत चैतन्य निर्माण केले. कॉंग्रेसचे सत्तेचे राजकारण थांबवा म्हणून सांगण्याची पाळी आली आहे. ती संधी तुम्ही दवडू नका, अशी हाक त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली.
आपल्या संघटनशक्तीपुढे धननीती टिकू शकत नाही.
मोदी यांनी आपल्या भाषणात गुजरात राज्याच्या विकासाचा आढावा घेतला. दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या कार्यक्रमात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्या आधुनिक सुखसोयी उपलब्ध नसतील, त्यापेक्षाही गुजरातच्या प्रत्येक गावात आज अधिक उपलब्ध आहे. आज गुजरातचा शेतकरी या साधनांचा वापर करून व्हिडिओ कॅमेराचा वापर करून शेतीविषयी शास्त्रीय माहिती मिळवू शकतो, इतकेच नव्हे, तर शिकागोमधील आपल्या मुलांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा बोलू शकतो. गुजरातमध्ये आज २४ तास थ्रीफेज वीज गावांतील लोकांना विनाखंडीत मिळते. मच्छीमार लोकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाद्वारे समुद्रात केव्हा जायचे व मासळी कुठे उपलब्ध आहे याचे मार्गदर्शन मिळते. प्रत्येक गावात ब्रॉडबॅण्ड कनेक्शन आहे म्हणून आज देशातील इतर राज्य "गुजरात मॉडेल' हा शब्द प्रयोग वापरतात. गौहत्तीला बांगलादेशाची भीती वाटे तर गुजरात पाकिस्तानजवळ आहे पण मोदींना पाकिस्तान भिते. परंतु भारताचे संरक्षणमंत्री अमेरिकेत जाऊन पाकिस्तानला आवरा म्हणून सांगतात ही शरमेची गोष्टी आहे.
देशाचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचा उल्लेख त्यांनी थ्री इन वन असा केला. अर्थमंत्री हंगामी पंतप्रधान असून पाच लाख लोकांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार असे सांगताना त्यांना काहीच कसे वाटत नाही. उलट गुजरातमध्ये २५ लाख नोकऱ्या उपलब्ध आहेत ही किमया फक्त आधुनिक व वैज्ञानिक संसाधनाचा वापर केल्यामुळे झाली.
आरंभी उत्तर गोवा खासदार व पक्षाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी दीपप्रज्वलन करून या संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी व्यासपीठावर भाजपचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य, आमदार विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर उपस्थित होते. प्रारंभी पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी स्वागत केले. नंतर मांद्रे मतदारसंघाचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर, शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, म्हापशाचे आमदार ऍड. फ्रान्सीस डिसौझा, मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक यांचे यावेळी भाषण झाले. बूथ संमेलनात तीन ते चार हजार कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी बैठकस्थळी येताच सुवासिनीने त्यांची ओवाळणी करून त्यांना संमेलनस्थळी आणले. माजी आमदार सदानंद शेट तानावडे यांनी सूत्रसंचालन केले. युवा अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी आभार मानले.

No comments: