Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 23 August, 2010

देशभक्त शिवाजीः आधुनिक अन्वयार्थ

एकीकडे संशोधकांचा प्रत्यक्ष पुराव्यावर भर देण्याच्या बाबतीत एका परिच्छेदात जेम्स म्हणतो -We see articles by the likes of Rajawade that center on narrow questions of historical details (P78) व्वारे लेन ! एकीकडे रानड्यांनी आग्राच्या ऐवजी दिल्ली केले म्हणून त्यांची चूक काढायची, दुसऱ्या बाजूला ऐतिहासिक पुराव्यांचा पाठपुरावा करणाऱ्यांना narrow questions of historical details म्हणून जणू हिणवायचे. यानंतर लेन जदुनाथ सरकार, सरदेसाई, पुरंदरे इ. आधुनिक संशोधकांच्या लिखाणावर घसरतो. त्यात स्वराज्याचा उल्लेख येतो. तो लिहितो- In other words, shivaji is deemed important because he established svarajya, a ward he did indeed use to describe his kingdom (though perhaps with a different meaning than it carries today) (पृ८३). कितीही प्रयत्न केला तरी कुत्र्याची शेपूट वाकडी असा हा प्रकार आहे. शिवाजी महाराजांनी वापरलेला शब्द केवळ स्वराज्य नसून हिन्दवी स्वराज्य होता हे यापूर्वी नमूद केले आहे. त्याचा अर्थ पुंडावा करून जहागीर मिळविणे आणि स्वत:चे स्तोम माजविणे इतक्यापुरता मर्यादित नव्हता, ती शिवाजी राजांना विशीच्या आत कळलेली "श्रींची इच्छा' होती. ग्रॅँटडफने लिहिलेल्या व १८२६ साली प्रसिद्ध झालेल्या आवृत्तीत तोच शब्द वापरला आहे.
त्यामुळे सरदेसाई जेव्हा राष्ट्र शब्द वापरतात ते केवळ स्वतंत्र राज्य नसून हिन्दवी स्वराज्य-हिन्दूंचे राष्ट्रच असते. लेनला मात्र सरदेसाईंच्या शब्दांवर आक्षेप घ्यायचा आहे.तो लिहितो, However much sardesai revered sarkar as a Meticulovs historian, he himself had no qualms about using the word nation to describe shivaji's independent state (Svaraj) (पृ.८१) हिन्दूंच्या संदर्भात राष्ट्र, एकता, सांस्कृतिक सामंजस्य इत्यादी गोष्टी वास्तवात असू शकतात हे लेनसारख्या तर्कदृष्टांच्या आकलनापलीकडचे आहे.
यानंतर लेन ब. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणावर घसरला आहे. (पृ ८६-८८) बाबासाहेब पुरंदऱ्यांनी शिवचरित्र सामान्य लोकांपर्यंत पोहचविले. त्यांनी या संदर्भात केलेले परिश्रम, संशोधन आणि नाट्यीकरण यांचा तो आपल्या पद्धतीने विचार करतो. पुरंदरेंच्या शिवचरित्रात अफजलखान वधाच्या संदर्भात ते पौराणिक संदर्भ देतात. ते नरसिंहावताराचा निर्देश करतात. त्यांचे लिखाण ऐतिहासिक, पुराव्यांना घट्ट धरून आहे हेही लेन कबूल करतो. Purandare, makes full use of these rich mythological details, even while carefully attending to the historical record, (पृ ८७). पुरंदरे स्वत:ला शिवशाहीर म्हणवून घेतात. ते शब्दप्रभू आहेत आणि त्यांनी ऐतिहासिक पुराव्यांनाच प्राधान्य दिले आहे, याची नोंद घेतली पाहिजे. बाबासाहेबांनी लिहिलेले शिवचरित्र हे सनावळ्या, तहाची कलमे इ.च्या पुढे जाऊन शिवचरित्राचे वर्णन करणारी विश्वसनीय आणि आधुनिक बखर आहे.लेनला त्यांच्या शिवचरित्रात neo- Hindu nationalism (पृ ८८) दिसतो.आणि मूळात लेनला हिन्दू Identity च नाकारायची आहे.
राहिली देशभक्तीची संकल्पना. ही भू-सांस्कृतिक (Geo-cultural) संकल्पना आहे. समर्थ रामदासांनी या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही.
मऱ्हाष्ट धर्म राहिला काही, तुम्हा करीता।। शिवाजी महाराजांना उद्देशून लिहिलेल्या या ओवीत ती स्पष्ट होते. महाराष्ट्रधर्माचा उल्लेख त्यापेक्षाही पूर्वीपासून म्हणजे गुरूचरित्र, महिकावती बखर इ.तून मिळतो. त्याचा आधुनिक काळातील अर्थ न्या. रानड्यांनी patriotism असा केला आहे. त्याला इतर अनेक विद्वान व विचारवंतानी दुजोरा दिला आहे. (शककर्ते शिवराय खं१पृ १८९-१९३) हे सर्व खोटे आणि लेन फक्त खरा असे होणार नाही. म्हणून महाराष्ट्रधर्मासाठी लढणारे, त्याचे रक्षण करणाऱ्या शिवरायांना देशभक्तच म्हणायला पाहिजे.
- क्रमशः

No comments: