Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 22 August, 2010

केंद्राकडून गोव्याला सावधगिरीचे आदेश

दहशतवादी हल्ले होण्याचा धोका
पणजी, दि.२१ (प्रतिनिधी): राज्यात श्रावण महिन्यात विविध धार्मिक उत्सवांना उधाण आले आहे. पुढील महिन्यात गणेश चतुर्थी उत्सवालाही प्रारंभ होणार असून या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ला होण्याचा धोका असल्याने राज्य सरकारला सुरक्षेसंबंधी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आले आहेत.
राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीत या वृत्ताला दुजोरा दिला. यासंबंधी पोलिस खात्याला सतर्क राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. रात्रीची गस्त वाढवण्यासह संशयित व अनोळखी लोकांवर कडक नजर ठेवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.राज्यातील महत्त्वाची व गर्दीची ठिकाणांना विशेष सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध राज्यांना यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.लष्कर ए तोयबा या संघटनेकडून या उत्सव काळात हल्ला होण्याचे संकेत गुप्तचर यंत्रणांकडून प्राप्त झाल्याने त्यामुळेच हे आदेश जारी केल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संदेशानुसार संपूर्ण राज्यात सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून पोलिस सुरक्षेसाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत.

No comments: