Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 May, 2009

कुठ आहे वाघ?


वनखात्याचा उलटा सवाल


पणजी, दि.३० (प्रतिनिधी)-"कोण म्हणतो वाघाची हत्या झाली. कोठे आहे मृत वाघाचे अवशेष, कोठे आहे मृत वाघाचे छायाचित्र' असे सवाल उपस्थित करून मुख्य वनपाल शशीकुमार यांनी तथाकथित वाघाची हत्याप्रकरणाची हवाच काढून घेतली आहे. केरी-सत्तरी येथील तथाकथित पट्टेरी वाघाच्या हत्येबाबत खात्याकडे कोणताही पुरावा नाही तसेच हा प्रकार खरा असल्याच्या खुणाही सापडल्या नाहीत. ही वार्ता पहिल्यांदा उघडकीस आणलेले पर्यावरणतज्ज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी तथाकथित छायाचित्राची सखोल माहितीही दिली नसल्याचे शशीकुमार यांनी यावेळी सांगितले.
पणजी येथील वनखात्याच्या मुख्यालयात आज मुख्य वनपाल शशीकुमार यांची भेट घेतली असता त्यांनी ही माहिती दिली. मुळात या भागात पट्टेरी वाघाची हत्या झाल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर येथे सर्वत्र तपासणी करण्यात आली. मुळात वाघाची हत्या झाल्याची जागा तर मिळाली नाहीच परंतु कोणते अवशेषही सापडले नाहीत, असे ते म्हणाले. वृत्तपत्रात आलेल्या माहितीच्या आधारे चौकशी सुरू असून हा अहवाल पुढील आठवड्यात सादर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे तर काही लोकांच्या जबान्या नोंदवण्यात आल्या आहेत. परंतु, एखाद्या निष्कर्षाप्रत येण्यासारखे काहीही सापडले नाही, असेही स्पष्टीकरण शशीकुमार यांनी दिले. दरम्यान, या ठिकाणी वाघाची हाडे सापडली असून ती हैदराबाद येथे चाचणीसाठी पाठवण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याची माहिती दिली असता ही माहिती खोटी असल्याचे ते म्हणाले. केरी येथे पट्टेरी वाघाची हत्या झाल्याचा एकमेव पुरावा म्हणजे काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले छायाचित्र आहे. मुळात या छायाचित्राबाबत प्रा. केरकर यांच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्याचेही यावेळी शशीकुमार म्हणाले.
याप्रकरणी वनखाते राजकीय दबावाखाली हे प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना, असाही सवाल उपस्थित होत आहे. मुळात या भागात वाघाचा संचार सुरू असल्याची माहिती वेळोवेळी वनखात्याला देऊनही त्यांच्याकडून कोणतीही उपाययोजना आखण्यात आली नाही, अशी तक्रारही करण्यात येत आहे. वाघांच्या अस्तित्वाबाबत खुद्द वनखात्याकडून काही वर्षांपूर्वी अहवाल तयार करण्यात आला असताना आता वाघ नसल्याचा दावा खाते करत आहे. वाघाची हत्या करणे हा वन्यसंरक्षण कायद्याअंतर्गत मोठा गुन्हा असल्याने व केरी सत्तरी येथील तथाकथित वाघाच्या हत्याप्रकरणात स्थानिकांचाच हात असल्याने त्यांना अभय देण्यासाठी हे प्रकरण मिटवण्याचे जोरदार प्रयत्न उच्च पातळीवर सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

No comments: