Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 27 April, 2009

देशी इतिहासावर भर हवा

एनसीईआरटी पुस्तकावरील चर्चासत्राचा सूर

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - गोवा शालान्त मंडळाने सातवीच्या विद्यार्थ्यासाठी "एनसीईआरटी' अभ्यासक्रमाचे लागू केलेले इतिहासाचे पुस्तक रद्द करून त्यात तीस टक्के देशी इतिहासाचा समावेश करण्याची जोरदार मागणी आज हिंदू जनजागृती समितीने आयोजित केलेल्या चर्चासत्रात करण्यात आली. त्याचप्रमाणे हे पुस्तक रद्द करण्यासाठी वैचारिक पातळीवर लढा देण्याचाही निर्धार यावेळी करण्यात आला. त्याचप्रमाणे पहिले ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचा पुनर्अभ्यास केला जावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या सातवीच्या पुस्तकात मोगलांची विस्तृत माहिती देण्यात आली असून त्या समकालीन भारतातील राजांची मात्र पुसटशीही माहिती देण्यात आलेली नाही. या पुस्तकात एका विशिष्ट धर्माचा उदो उदो करण्यात आला आहे. "मशीद'चे बांधकाम कसे असायचे याचीही माहिती या इतिहासाच्या पुस्तकात देण्यात आल्याचे यावेळी मडकई येथील आनंदीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश नाईक यांनी दिली. भगतसिंग क्रांतिकारी नसून दहशतवादी होते, रामायण काल्पनिक असून श्रीहनुमानाचीही विटंबना या पुस्तकात करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. देशद्रोही शक्तीने "एनसीईआरटी'च्या माध्यमातून भारताचा उज्ज्वल भूतकाळ लपवून ठेवण्याचा कटकारस्थान रचले आहे, असे मत श्री. नाईक यांनी यावेळी व्यक्त केले. शिक्षणात अन्य विषयांप्रमाणेच इतिहास हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याने नवी पिढी घडते. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहास शिकवला जावा, असा राज्याचा नियम आहे. परंतु, त्याला फाटा देऊन केवळ मोगलांचा आणि ब्रिटिशांचा इतिहास शिकवला जात असल्याचे सांगून हे पुस्तक रद्द करून स्थानिक इतिहासाचा समावेश करूनच नव्याने पुस्तक प्रकाशित केले जावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
कागद कमी पडतो म्हणून "मनुस्मृती' ग्रंथ पुसून तो कागद लिहिण्यासाठी एका लेखकाने वापरला, असे उदाहरण या पुस्तकात देण्यात आल्याची माहिती यावेळी धर्म शक्ती सेनेचे प्रमुख सदाशिव धोंड यांनी दिली. हे आंदोलन गोवा तसेच महाराष्ट्र राज्यातही चालवले जात असल्याचे ते म्हणाले. शिक्षणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारत ताब्यात घेण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचे मत यावेळी जयेश थळी यांनी व्यक्त केले.
मोठ्या प्रमाणात सनातन संस्थेला विरोध केला जात आहे. काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते धमक्या देत आहेत. सनातन प्रभात या वर्तमान पत्राच्या संपादकांना दोन वेळा तुरुंगात डांबण्याचा प्रकार घडला. मुंबईत बॉंम्बस्फोट झाला त्यावेळी कोणतेही पुरावे नसताना "सनातन संस्थेवर बंदी घातली' अशा बातम्या प्रसिद्ध करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती यावेळी सौ. शोभा सावंत यांनी दिली. सनातन संस्थेने राष्ट्र पुरुषांचे छायाचित्र वापरून वह्या छापल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांची माहितीही पहिल्या व शेवटच्या पानांवर देण्यात आली आहे, अशी माहिती शुभांगी गावणेकर यांनी दिली. यावेळी मुख्याध्यापक अरुण नागवेकर, पालक प्रकाश मळीक, सुशांत दळवी, निवृत्त शिक्षिका कुमुद कामत यांनी आपले मत व्यक्त केले.

No comments: