Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 28 April, 2009

सीआयडीची पसंती कॉंग्रेसला तर "आयबी'ची भाजपला

गोव्यातील लोकसभा निवडणूक

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) - गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत कुणाचा विजय होईल,याबाबत भाजप,कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे दिसून आले आहे. या दोन्ही पक्षांनी विजयाचा भक्कम दावा केला असला तरी यावेळच्या मतदान पद्धतीने काही नेत्यांच्या मनात जयपराजयाबद्दल चांगलीच संभ्रमावस्था निर्माण केली आहे. एकीकडे राजकीय पक्षांचे अंदाज सुरू असताना सरकारच्या गुप्तचर यंत्रणांच्या अंदाजातही चांगलीच तफावत असल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने स्थानिक पोलिसांच्या गुप्तचर विभागाने (सीआयडी) राज्यातील दोन्ही जागा कॉंग्रेस व राष्ट्रवादीला मिळतील असा अंदाज वर्तवला आहे; तर केंद्र सरकारची विश्वासार्ह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) ने गोव्यातील दोन्ही जागा भाजपलाच मिळतील असा अहवाल केंद्र सरकारला पाठवला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
उत्तर गोवा मतदारसंघात एकूण ७ उमेदवार रिंगणात हो. तथापि, खरी लढत भाजपचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक व राष्ट्रवादीतर्फे उतरलेले जितेंद्र देशप्रभू यांच्यातच आहे. सतत दोनदा उत्तरेतून निवडून येण्याची किमया साधलेल्या श्रीपाद नाईक यांनी आपण "हॅटट्रिक' अवश्य करणार असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र देशप्रभू हे मात्र आपल्या विजयाबाबत कमालीचे आश्वासक दिसतात. श्रीपाद नाईक यांच्यामागे ठामपणे उभा राहणारा बहुजन समाज दुभंगल्याचे कारण त्यांच्या समर्थकांकडून पुढे केले जात आहे व नेमका त्याचा फायदा पेडण्याचे जमिनदार असलेल्या देशप्रभू यांना होणार आहे,असाही त्यांचा दावा आहे. आतापर्यंत आपली "वोटबॅंक' समजून केवळ मतांसाठी आपला वापर करून घेतला जातो,अशी भावना बनलेल्या अल्पसंख्याक मतदारांनी यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान केल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
प्रामुख्याने सुशिक्षित अल्पसंख्याक विद्यमान सरकारच्या राजवटीस उबगला आहे व त्यामुळे त्यांनी यावेळी सरकारच्या विरोधात मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे.
उत्तरेत २००४ च्या निवडणुकीत श्रीपाद नाईक यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.विल्फ्रेड डिसोझा यांचा ५६,२१३ मतांनी पराभव केला होता.डॉ.विली यांना ८८,६२९ व श्रीपाद यांना १,४४,८४२ मते मिळाली होती. मुळात श्रीपाद यांची ५६,२१३ मतांची आघाडी मागे टाकणे सहज शक्य आहे का,असा सवाल उपस्थित होतो. देशप्रभू हे मात्र याबाबत ठामपणे बोलताना दिसतात. गेल्यावेळी डॉ.विली हे कमकुवत उमेदवार होते व त्यांच्यासाठी कुणी प्रामाणिकपणे कामही केले नव्हते. यावेळी मात्र श्रीपाद यांच्यासमोर तोलामोलाचा उमेदवार म्हणून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रेष्ठींनी आपली निवड केली व त्याचबरोबर आघाडी सरकारच्या सर्व घटकांनी प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम केल्याने ही आघाडी पिछाडीवर पडण्यास अजिबात वेळ लागणार नाही,असा दावा त्यांनी काही पत्रकारांसमोर केला आहे.
दरम्यान,यावेळी दोन्ही नेते आपल्या विजयाचा दावा करीत असले तरी त्यात एक विशेष फरक स्पष्टपणे दिसून येतो. श्रीपाद नाईक हे केवळ निवडणुकीपुरते लोकांच्या संपर्कात नसून खासदार या नात्याने त्यांचा संपर्क सातत्याने सुरू आहे. एवढेच नव्हे तर त्यांची उमेदवारी सर्वांत प्रथम जाहीर झाल्याने त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पादाक्रांत केला आहे. विविध ठिकाणी मतदारांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद व मतदारांनी आपल्या विजयाची खात्री दिल्याचा दावा ते करतात. दुसरीकडे देशप्रभू यांची उमेदवारी अखेरच्या क्षणी जाहीर झाली त्यामुळे प्रत्यक्ष मतदारांची भेट घेणे त्यांना शक्य झाले नाही. त्यांनी अधिकतर प्रमुख कार्यकर्ते व नेत्यांवर आपली मदार ठेवली आहे. विद्यमान आघाडी सरकारातील नेत्यांनी आपल्याला आघाडी मिळवून देण्याची हमी दिल्याने ते आपल्या विजयाची खात्री बाळगून आहेत. बाकी आघाडी सरकारकडून भाजपची मते कमी करण्यासाठी उतरवण्यात आलेले मगोपचे उमेदवार पांडुरंग राऊत यांना उतरवण्याची शक्कल कितपत यशस्वी ठरते हा देखील चर्चेचा विषय आहे.
खासदार श्रीपाद नाईक हे बहुजन समाजाचे नेते आहेत व तीच त्यांची खरी ताकद आहे. यावेळी श्रीपाद नाईक यांच्याबाबतीत अपप्रचार करून त्यांच्या मागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या बहुजन समाजात फूट पाडण्याचेही प्रयत्न झाले. राष्ट्रवादीचे उमेदवार देशप्रभू यांच्या विजयाबाबत खात्री बाळगणाऱ्या नेत्यांकडून याच अपप्रचाराचा लाभ त्यांना मिळणार आहे,असे बोलले जाते. उत्तर गोवा हा बहुजन समाजाचा बालेकिल्ला आहे,असे असताना बहुजन समाजाच्या उमेदवारांना डावलून मतदार उच्चवर्णीय उमेदवाराला पसंती देतात काय, हेदेखील या निकालावरून स्पष्ट होईल. आतापर्यंत वेळोवळी आपल्या एकतेचे दर्शन घडवून आपल्या नेत्यांच्या मागे ठामपणे उभा राहणारा बहुजन समाज यावेळी खरोखरच अशा अपप्रचाराला बळी पडला आहे का, की "ऐकावे जनाचे करावे मनाचे' या उक्तीप्रमाणे हे सारे दावे फोल ठरवून हा समाज आपल्या एकजुटीचे दर्शन पुन्हा घडवेल, हेच या निकालावरून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे साहजिकच निकालाबाबत लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

No comments: