Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 May, 2009

राज्यात उष्माघाताची शक्यता

प्रतिबंधात्मक उपायांचे आरोग्य खात्याचे आवाहन
पणजी, दि.३० (प्रतिनिधी) - हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत राज्यातील तापमान ४० अंशापर्यंत पोचून उष्माघाताची लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आरोग्य खात्याने लोकांना काही प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात उष्माघाताची लाट व त्याविरुद्ध जागृती मोहीम हाती घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आरोग्य खात्याला दिल्या आहेत. उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी लोकांनी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, हलके आणि सैल कपडे वापरावेत, उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी टोपी, गॉगल आणि छत्रीचा वापर करावा तसेच चहा, कॉफी, सोडा आणि दारू पिण्याचे टाळावे, अशा सूचना केल्या आहेत.
उष्माघाताचा त्रास झालेल्या व्यक्तीस उन्हातून सावलीत नेऊन थंड जागेत झोपायला लावून पाय सुमारे १ फूट उंचीवर ठेवावेत. त्याचे कपडे सैल करावे आणि त्याला थंडावा देण्याचा प्रयत्न करावा. थंड पाणी, स्प्रे, शॉवर, आदी माध्यमांतून थंडावा किंवा थंड पेय द्यावे, एखादा चमचा साखर व चिमूटभर मीठ टाकून पाणी पिण्यास द्यावे. स्नायुभंग झाल्यास दर पंधरा मिनिटांनी मसाज करावा असे उपाय आरोग्य खात्यातर्फे सुचवण्यात आले आहेत. या उपायांनी अशा इसमामध्ये सुधारणा न झाल्यास त्याला जवळच्या आरोग्य सुविधा केंद्रात हालवावे.

No comments: