Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 May, 2009

जाळलेल्या स्थितीत त्या वाघाची हाडे व पंजा वन खात्याच्या हाती

केरी सत्तरीतील पट्टेरी वाघ हत्या प्रकरण

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) - केरी सत्तरी येथील पट्टेरी वाघाची हत्या झाली आहे ही खरी गोष्ट आहे व त्याबाबतचे काही महत्त्वाचे पुरावे वन खात्याला मिळाले आहेत. या प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने सुरू आहे व येत्या काही दिवसांत गुन्हेगारांचा शोध लागेल,असे स्पष्टीकरण या प्रकरणाची चौकशी करणारे प्रमुख तथा वन खात्याचे उपविभागीय वनाधिकारी सुभाष हेन्रीक यांनी केले आहे. वाघेरी पठाराच्या खाली केरी गावातील एका काजू वनात एका ठिकाणी जाळलेल्या जागेत वाघाच्या पायाचा पंजा व हाडे सापडली आहेत.ही जागा केरी गावातील माजीकवाड्यापासून केवळ ३ किलोमीटर अंतरावर आहे,अशीही माहिती मिळाली आहे.
दरम्यान, केरी येथील गणेश माजिक याच्या मालकीच्या काजू वनात हे अवशेष सापडले आहेत. केवळ तेवढाच भाग जळालेला आढळल्याने मृत वाघाला या ठिकाणी जाळण्यात आल्याचा संशय बळावला आहे.मुळात वाघाची हत्या करणे हा वन्य सरंक्षण कायद्याअंतर्गत मोठा गुन्हा आहेच वरून पुरावे नष्ट करणे हा त्याहुनही गंभीर गुन्हा आहे,अशी माहिती श्री.हेन्रीक यांनी दिली. याठिकाणी वाघाची कवटी व इतर महत्वाच्या अवयवांचे अवशेष सापडले नसले तरी या जागेच्या जवळच वाघाचे सात दात व रक्त सांडलेली काही पाने सापडल्याची माहिती देण्यात आली. हे सर्व अवशेष भारतीय वन्यजीव संस्था,देहराडून येथे पाठवण्यात आले आहेत व तेथील अहवालानंतरच हे अवयव वाघाचे आहेत की काय,हे स्पष्ट होणार आहे.याप्रकरणी वन खात्याकडून यापूर्वी अंकुश रामा माजीक,गोपाळ माजीक व भीवा उर्फ पिंटू गावस यांना अटक केली होती व नंतर त्यांना सोडण्यातही आले. दरम्यान, केरी गावातील अनेकांनी सध्या वन खात्यावर टीकेची झोड उठवली आहे.वाघ हत्या प्रकरणी वनाधिकाऱ्यांकडून विनाकारण सतावणूक सुरू असून काही लोकांना विनाकारण मारहाण केली जात असल्याचाही आरोप या लोकांनी केला आहे. वनाधिकाऱ्यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले असून केवळ या चौकशीत अडथळे निर्माण करण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचे खात्याकडून सांगण्यात आले..तरीही जर खरोखरच वनाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून विनाकारण मारहाण केली असेल तर त्याची चौकशी केली जाईल,असे मुख्य वनपाल डॉ.शशिकुमार यांनी सांगितले.
पर्यावरणप्रेमीची अशीही व्यथा
केरी सत्तरी येथील तथाकथीत पट्टेरी वाघ हत्या प्रकरण सध्या बरेच गारज आहे खरे; परंतु खुद्द केरी गावातच राहणारे पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकर यांनी हे प्रकरण उघडकीस आणल्याने त्यांना मात्र खूपच मनस्ताप सहन करावा लागत असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी केरी गावातीलच काही लोक गुंतल्याचा संशय असल्याने प्रा.केरकर यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष पसरला आहे.त्यांनी या प्रकरणाची वाच्यता केल्याने भर गावात सभा बोलावून त्यांना अपमानीत करण्याचा प्रकारही घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे प्रकरण मिटवण्यासाठी वन खात्यावर राजकीय दबाव टाकण्यात आल्याने त्यांनीही सुरूवातीला प्रा.केरकर यांनाच लक्ष्य बनवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणी एकमेव पुरावा असलेले मृत वाघाचे मोबाईलवरील छायाचित्र हेच मुळी बनावट असल्याचे सिद्ध करण्याचा बराच प्रयत्न वन खात्याकडूनही झाला परंतु वाघाची हत्या हा मोठा गुन्हा असल्याने व हा प्रकार केंद्रातील वन खात्याच्या लक्षात आल्याने त्यांनी राज्य वन खात्याला फैलावर घेतल्यानेच या प्रकरणाची चौकशी नेटाने सुरू झाल्याची माहितीही मिळाली आहे. हे वाघ हत्या प्रकरण उघड केल्याबद्दल प्रा.केरकर व त्यांचे कुटुंब सध्या अत्यंत मानसिक दडपणाखाली वावरत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

No comments: