Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 17 August, 2010

कामगारांच्या वेदनेला शब्दांची धार दिलेले कविवर्य नारायण सुर्वे निवर्तले

ठाणे, दि. १६ - कामगाराच्या वेदनेला शब्दांची धार देणारे, लालबाग-परळमधील गिरणी कामगारांची वेदना सोबत घेऊन जन्मलेले, आयुष्याचे विविध रंग अनुभवलेले, रस्त्यावरल्या जगण्याचे चटके सोसताना त्यांनी कामगार चळवळीची दाहकताही जवळून पाहिलेले ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे आज ठाणे येथील "हेल्थ केअर हॉस्पिटल'मध्ये निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते श्वसनविकार आणि दम्याच्या त्रासाने आजारी होते.
आज सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव प्रभादेवीतील लोकवाङ्मय गृह येथे अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले होते. नंतर संध्याकाळी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गिरणगावातील डाव्या चळवळीत त्यांनी समाजकारणाचे धडे घेतले. आपले ते रस्त्यावरचे आयुष्य हे ' माझे विद्यापीठ ' च आहे असे त्यांनी मानले आणि ते शब्दांतही मांडले.
"कामगार आहे मी तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे'
नारायण सुर्वे यांचा पहिला काव्यसंग्रह ' ऐसा गा मी ब्रह्म! ' १९६२ मध्ये प्रकाशित झाला. त्या सुमारास ते मौज , सत्यकथा , मराठा , मांडवी , वीणा , युगांतर , भारूढ अशा काही नियतकालिकांतून कविता लिहित होते. त्यानंतरच्या चार वर्षांनी त्यांचा दुसरा काव्यसंग्रह आला. ' माझें विद्यापीठ '
कामगार जीवनाशी असलेल्या थेट संबंध असल्यामुळे कवी मनाचे नारायण सुर्वे यांनी शाळेत शिक्षक म्हणून शिकवत असतानाच कामगार चळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. १९७० च्या दशकात भारत , तत्कालीन सोव्हिएट महासंघ आणि पूर्वेकडील देशांमध्ये सक्रीय कामगार नेते म्हणून त्यांची नवी ओळख निर्माण झाली. मुंबईतील कामगार संघटनेत काम करताना त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी तीव्र संघर्ष केला. तथापि, त्या मंतरलेल्या काळातही कवितेशी असणारी मैत्री त्यांनी तोडली नाही.
कवितेतून भीषण वास्तव मांडणाऱ्या नारायण सुर्वे यांना १९९८मध्ये "पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना सुवर्ण कमळ आणि १९९९च्या कबीर पुरस्काराने गौरविण्यात आले. परभणी येथे १९९५ मध्ये पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. साहित्य अकादमीवर मराठी साहित्य या विषयासाठी नेमलेल्या सल्लागार समितीवर समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
नारायण सुर्वे यांची साहित्यसंपदा
"ऐसा गा मी ब्रह्म' (१९६२)
"माझे विद्यापीठ' (१९६६)
"सनद जाहीरनामा' ( १९७८)
माणूस कलावंत
आणि समाज
सर्व सुर्वे ( संपादन: वसंत शिरवाडकर )
"कहाणी कवितेची'

No comments: