Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 20 August, 2010

रसिकाला सात दिवस कोठडी

टोळी नसल्याचा पोलिसांचा दावा
डिचोली, वाळपई, दि. १९ (प्रतिनिधी) - गाडगीळ आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित रसिका ऊर्फ रशिगंधा शेटये या तरुणीला आज डिचोली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करून सात दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही टोळी नसल्याचे स्पष्ट केले आहे. रसिका ही एकटीच गाडगीळ यांना "ब्लॅकमेल' करीत होती, तिच्यासोबत अन्य कोणीही या प्रकरणात नाही, असा दावा डिचोली उपविभागीय पोलिस उपअधीक्षक बोसुयट सिल्वा यांनी केला आहे. रसिकाला सात दिवसांच्या पोलिस कोठडीत घेण्यात आले असून आम्ही तिची कसून चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गाडगीळ याच्या मृतदेहाच्या पॅंटच्या खिशात पोलिस निरीक्षकांच्या नावाने लिहून ठेवण्यात आलेली चिठ्ठी पोलिसांनी मिळाली होती. त्यात रसिका हिच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच अन्य पाच जणांचे मोबाईल क्रमांकही गाडगीळ यांनी लिहून या क्रमांकावरून धमकीचे दूरध्वनी येथ असल्याचे म्हटले होते. त्यातील काही मोबाईल क्रमांक हे रसिका हिच्या प्रियकराचे असल्याचे पोलिसांची म्हणणे असले तरी, त्या प्रियकराचा या प्रकरणात सहभाग नसल्याची "क्लिनचीट' पोलिसांनी त्याला दिली आहे.
त्याचप्रमाणे, जे "अश्लील क्लिपींग' दाखवून रसिका मयत गाडगीळ यांना ब्लॅकमेल करीत होती, ते क्लिपींगही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. याविषयी श्री. सिल्वा यांना विचारले असता ,आम्ही ती वापरत असलेला मोबाईल जप्त केला असून तो हैदराबाद येथील वैद्यकीय चाचणीसाठी पोलिस प्रयोगशाळेत पाठवून दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या मोबाईलवरील क्लिपींग तिने पुसून टाकले असले तरी ते आम्ही पुन्हा मिळवू शकतो, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
मात्र, गेले अनेक दिवस पोलिसांनी रसिका हिला मोकळे सोडून तिला पुरावे नष्ट करण्यासाठी पुरेपूर वेळ दिला असल्याची जोरदार चर्चा सध्या वाळपई भागात सुरू झाली आहे.

No comments: