Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 16 August, 2010

नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडावा - पंतप्रधान

राजधानी दिल्लीत स्वातंत्र्यदिन उत्साहात

नवी दिल्ली, दि. १५ - नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून थेट चर्चेच्या टेबलावर यावे असे आवाहन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज ६४व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याप्रसंगी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केले. पंतप्रधानांनी सलग सातव्या वर्षी लाल किल्ल्यावर तिंरगा फडकावला.
महागाई कमी करणे आणि शेतकऱ्यांचे हित जपणे यासाठी अनेक सवलती देण्यात येत आहेत. धान्याची बाजारभावांपेक्षा जास्त किमतीने खरेदी करण्यात येत आहे. या सगळ्यामुळे तिजोरीवर पडणारा ताण सहन करणे कठीण झाल्यामुळेच आम्ही पेट्रोल आणि डिझेलवर कर लागू करून महसुली उत्पन्न मिळवत आहोत. परिस्थिती अशी आहे की, इंधनाच्या दरावर नियंत्रण ठेवणे अवघड झाले आहे. तरीही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी शक्य ते प्रयत्न करू, असे पंतप्रधान म्हणाले.
देशाच्या विकासासाठी औद्योगिक आणि कृषी उत्पन्नात वाढ होण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. कृषी विकासाचा दर किमान चार टक्के राहावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. देशातील प्रत्येकाला उत्तम शिक्षण आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी ठोस कार्यक्रम राबवत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील सगळ्या राजकीय पक्षांना तसेच सरकारविरोधी आंदोलने करणाऱ्या गटांना चर्चेचे जाहीर आमंत्रण दिले.

No comments: