Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 24 April, 2010

...क्रिकेटच तारून नेईल: सचिन

मुंबई, दि. २३ : जीवन सहजासहजी जगायचे म्हटल्यास ते दरवेळी शक्य होणार नाही. जीवनात चढउतार येतच असतात. सध्या आयपीएलमध्येही अशाच प्रकारचे चढउतार सुरू आहेत, ते पार केले की केवळ क्रिकेटच शिल्लक राहणार आहे, आणि क्रिकेटचा सर्व तारून नेईल, अशी आशा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत सचिनने खेळ बदनाम होण्याच्या या घटना म्हणजे "वाईट काळ' असल्याचे म्हटले आहे.
आयपीएलचे कमिशनर ललित मोदी यांच्यासह आता अनेक राजकीय नेते यात गुंतल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे. यामुळे या स्पर्धेला गालबोट लागले आहे. मोदी यांनी राजीनामा द्यावा, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे.
एखादी स्पर्धात्मक घटना लाखो लोक पाहतात तेव्हा अशा गोष्टी मागे उरतात, असेही सचिनने स्पष्ट केले. सचिनचा संघ मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून रविवारी त्यांची लढत चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. १४ सामन्यात ५७० धावा करणाऱ्या सचिनच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याने त्याचे अंतिम सामन्यात खेळण्याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. असे झाले तर चेन्नईविरुद्धच्या सामन्यात केवळ प्रेक्षक म्हणून त्याला मैदानावर उपस्थित राहावे लागणार आहे. परंतु, सचिनने अद्याप आशा सोडलेली नाही. सध्या माझ्या हाताला सूज आली आहे. पण हातात बॅट धरणे शक्य झाले तर इतर गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, असे सचिन म्हणाला.
आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला सचिन उद्या २४ रोजी आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. अंतिम सामन्यापर्यंत मजल मारण्यात केवळ मैदानावरील खेळाडूंचेच परिश्रम नाहीत तर अतिरिक्त खेळाडू, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक व सर्व संबंधितांचा त्यात सहभाग आहे, असे सचिन शेवटी म्हणाला.

No comments: