Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 22 April, 2010

महागाईवर केंद्र सरकार विश्वासघातकी!

दिल्लीतील महारॅलीत भाजपाध्यक्ष गडकरींची धडाडली तोफ
नवी दिल्ली, दि. २१ : "केंद्रातील कॉंग्रेसच्या नेतृत्वातील संपुआच्या सरकारने महागाईच्या मुद्यावर लोकांच्या विश्वासाचा घात केलेला आहे. जेव्हा-जेव्हा कॉंग्रेस केंद्रातील सत्तेत येते, तेव्हा-तेव्हा जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये बेसुमार वाढ होते. "आम्ही सत्तेत आलो तर शंभर दिवसांच्या आत महागाईला लगाम घालून दाखवू,'असे आश्वासन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिले होते. कुठे केले ते आश्वासन? महागाईच्या दुष्टचक्रात गरीब आणि सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. निद्रेचे सोंग करणाऱ्या या सरकारला जागे करण्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत,''अशा शब्दांत भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज केंद्र सरकारवर तोफ डागली. महागाईप्रश्नी रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या "महारॅली'मध्ये उसळलेल्या जनसागराला संबोधित करताना ते बोलत होते. महारॅलीला संबोधित केल्यानंतर गडकरी यांना उन्हामुळे भोवळ आली.
""केंद्रातील संपुआ सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत बसलेले आहे. दुसऱ्या टर्ममध्येही सरकारने वर्षभराचा कालावधी पूर्ण केलेला आहे. मात्र, महागाई कमी करणे तर दूरच; उलट ती वाढतच आहे. यामुळे गरिबांच्या आत्महत्या होत आहेत,''असेही गडकरी यावेळी म्हणाले.
केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांवर प्रहार करताना गडकरी म्हणाले, ""महागाईच्या प्रश्नावर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे मी १४ प्रश्न उपस्थित केले होते. परंतु या १४ पैकी एकाही प्रश्नाचे उत्तर देण्यास संपुआ सरकारने तोंड उघडले नाही. का? या ज्वलंत मुद्यावर उत्तर देण्याच्या लायकीचा कॉंग्रेसमध्ये कुणीही उरलेला नाही का? चुकीची आर्थिक धोरणे व खराब प्रशासन यामुळेच महागाईचा मुक्त संचार सुरू आहे,''असे गडकरी यांनी सुनावले. यावेळी भाजपचे असंख्य कार्यकर्ते हातात भाजपचे झेंडे घेऊन उपस्थित होते.
खाद्यान्नाचा साठा वखारींमध्ये भरला जात असल्याचा आरोप करताना गडकरी यांनी, "सरकार साठेबाजीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. हे धान्य नंतर मद्यनिर्मात्यांना स्वत दरात विकले जाऊ शकता येईल, असा या मागचा सरकारचा उद्देश आहे,'असा आरोप केला. गडकरी यांच्यासोबतच या महारॅलीला लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटली, पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनाथसिंग, मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी आदी नेत्यांनीही संबोधित केले.
""सहा वर्षांपूर्वी संपुआ सरकारने पहिल्यांदा सूत्रे हाती घेतल्यापासून अत्यावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये १०० ते २०० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. सरकारचे चुकीचे व्यवस्थापन आणि भ्रष्टाचार यामुळे हे घडलेले आहे, ''अशी टीका लालकृष्ण अडवाणी यांनी केली.
""भाजपची ही रॅली खरोखर महारॅली आहे. या रॅलीने भाजपच्या यापूर्वीच्या सर्व रॅलींचे विक्रम मोडीत काढलेले आहेत,''असेही अडवाणी यावेळी म्हणाले.
यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आग ओकणाऱ्या उन्हात जिवाची तमा न बाळगता संसदेकडे कूच केले. या महारॅलीमुळे मध्य दिल्लीतील वाहतूक व्यवस्था कोलमडली. रिंग रोड, मथुरा रोड, इंडिया गेट, टिळक मार्ग, आसफ अली रोड, नेताजी सुभाष मार्ग, रणजितसिंग मार्ग, टॉलस्टॉय मार्ग, सिकंदर रोड, बाराखंबा रोड, संसद मार्ग आणि अशोक मार्गावरील वाहतूक कोलमडली. महारॅलीमुळे वाहतूक कोलमडण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन भाजपने, "१० ते ६ या वेळेत वाहतूक जाम झाली तर कृपया थोडी कळ सोसण्याची तयारी असू द्या,' असे आवाहन यापूर्वीच केले होते.

भाजपच्या महारॅलीत अवतरला "लघू भारत'
महागाईविरुद्धच्या भाजपच्या महारॅलीमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झालेत. विविध रंगांच्या वेशभूषेमुळे रॅलीस्थळाला "लघू भारत'चे स्वरूप आले.
आंध्रातून आलेल्या झांशी राणे हिने मंचाच्या अगदी समोर भाजीचे आणि खान-पानाचे दुकान व्यंगात्मक पद्धतीने थाटले होते. या दुकानामध्ये त्यांनी भाजी आणि खाद्याचे खूपच कमी पदार्थ ठेवले होते. याविषयी राणे यांना छेडले असता, त्या म्हणाल्या,""केंद्र सरकारच्या धोरणांमुळे दुकानांवर खाण्या-पिण्याच्या सामानांची स्थिती अशीच कमी दिसेल. आंध्रातून आलेल्या तेलंगणासमर्थक कार्यकर्त्यांनीही फलक घेऊन रॅलीमध्ये जोरदार नारेबाजी केली. बिहार आणि उत्तरप्रदेशातून आलेल्या कार्यकर्त्यांनीही उत्साहपूर्ण वातावरणात नारेबाजी केली.
------------------------------------------------------------
भाजपचा लोकसभेतून सभात्याग
"महागाईचे संकट हे नैसर्गिक नव्हे; तर संपुआ सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेच उद्भवलेले आहे. महागाईला लगाम घालण्यात, जीवनावश्यक वस्तूंच्या बेसुमार दरवाढीला आळा घालण्यात सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे,' अशा शब्दांमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने लोकसभेत सरकारला खडे बोल सुनावत आज सभात्याग केला.
लोकसभेत विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी घणाघाती शब्दांमध्ये सरकारला महागाईच्या मुद्यावर धारेवर धरले. ""महागाईचे संकट सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे ओढवलेले आहे. महागाई हे काही नैसर्गिक संकट नव्हे. सरकारला या संकटाचे निवारण करण्यात अनेकदा प्रयत्न करूनही अपयशच आलेले आहे. महागाईच्या या संकटात मारला जात आहे तो गरीब आणि सामान्य माणूस! संपुआ सरकारच्या या अपयशामुळेच आज राजधानी दिल्लीच्या रस्त्यांवर देशाच्या कानाकोपऱ्यांतून लाखोंच्या संख्येत लोक महागाईच्या मुद्यावरून सरकारचा निद्रानाश करण्यासाठी महारॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आता आम्हीही त्यात सहभागी होण्यासाठी बाहेर पडत आहोत,'' असे सुषमा स्वराज यांनी सांगताच लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे यांच्यासह भाजपच्या सर्व सदस्यांनी सभात्याग केला. सभात्याग करताना भाजप सदस्यांनी महागाईवरून सरकारविरोधी नारेबाजी केली.

No comments: