Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 24 April, 2010

पाणीपुरवठ्याबाबत हयगय नको: मुख्यमंत्री

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली असून विविध ठिकाणी पाणी टंचाईच्या तक्रारी वाढत चालल्याने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना त्याची दखल घेणे भाग पडले आहे. पावसाळ्यापूर्वी राज्यातील जनतेला पाण्याचा मुबलक पुरवठा करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत खास उच्चस्तरीय बैठकीत विचारविनिमय करण्यात आला असून त्याची तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री कामत यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी बोलावलेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते, सा. बां. खात्याचे सचिव, सा.बां. खात्याचे मुख्य अभियंता व खात्याचे वरिष्ठ अधिकारी हजर होते. राज्यात कोणकोणत्या भागात पाणी टंचाई भासते याचा दैनंदिन आढावा घेऊन तिथे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासंबंधी प्राधान्य दिले पाहिजे. कमी दाबाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी लोकांना पाणी मिळत नाही. अशावेळी पाण्याची गती सांभाळण्याची व पाण्याचा पुरवठा शेवटच्या टोकापर्यंत पोचल्याची हमी करून घेण्याचे आदेशही मुख्यमंत्री कामत यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्य प्रशासनाने पाणीपुरवठ्याच्या संदर्भात कोणतीही हयगय करू नये, असे सक्त निर्देश देत दैनंदिन परिस्थितीची आपल्याला माहिती देण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. पुढील दोन ते तीन महिने पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत व त्यासाठी पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहावे, असे आवाहनही मुख्यमंत्री कामत यांनी केले.

No comments: