Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 12 April, 2009

उमेदवारांत खुली चर्चा व्हावी : अडवाणी

बालाघाट, दि. ११ : देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. अशा स्थितीत जनतेच्या उपस्थितीत निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांत खुली चर्चा व्हावयास हवी, असे मत भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केले. अशा खुल्या चर्चेमुळे लोकशाही मजबूत होईल, जनता शहाणी होईल व तिच्या निर्णय क्षमतेत वाढ होईल. बालाघाट येथील भाजपाचे उमेदवार के. डी. देशमुख यांच्या समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेत अडवाणी बोलत होते.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत ज्याप्रमाणे उमेदवारांत खुली चर्चा होत असते तशीच चर्चा आपल्या येेथेही व्हावी, असे मत व्यक्त करून अडवाणी यांनी पुढे सांगितले की, म्हणूनच मी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही चर्चेचे निमंत्रण दिले होते. खुल्या चर्चेत तुम्हाला सहभागी व्हावयाचे नसेल तर पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळण्याची ज्याच्यात क्षमता आहे अशा कोणत्याही उमेदवाराला चर्चेला पाठवा, असे आवाहनही त्यांना केले होते.
कोेण जिंकेल व कोणाचे सरकार स्थापन होईल हे निवडणुकीच्या माध्यमातून सिध्द होत असते, असे सांगून अडवाणी पुढे म्हणाले, याबरोबर लोकशाही प्रणालीही मजबूत होत असते. एवढेच नाही तर सर्वसामान्य जनतेत जाऊन आपल्या योजनांचा खुलासा करता येतो. जनतेत जाऊन राजकीय शिक्षण देण्याचे कार्यच कॉंगे्रस पक्षाने सोडून दिलेले आहे. या पक्षाचे लक्ष आता केवळ जातपात व पैशाच्या आधारावर लोकांची मते प्राप्त करणे यावरच केंद्रित झाले आहे, असे अडवाणी यांनी सांगितले.
निवडणुका जिंकून सत्ता प्राप्त करणे एवढाच भाजपा व त्याच्या सहयोगी पक्षांचा उद्देश नाही तर देशाचा विकास व सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आम्ही राजकारणात आलेलो आहोत. याचे उदाहरण मध्य प्रदेशचे देता येईल. येथे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी समाजातील सर्व वर्गांसाठी कल्याणकारी योजना बनविल्या. त्यांची "लाडली लक्ष्मी योजना' मुलींसाठी वरदान ठरली आहे. मध्यप्रदेशप्रमाणेच देशात लाडली लक्ष्मी योजना लागू केली जाईल, असे अडवाणी यांनी सांगितले. केंद्रात जर रालोआचे सरकार आले तर २१ वे शतक हे भारतीयांचे राहील. यावेळच्या निवडणुका देशाचा इतिहास बदलविणाऱ्या ठरतील, असे अडवाणी म्हणाले.

No comments: