Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 16 April, 2009

बिहार, झारखंडमध्ये नक्षल्यांचा हैदोस, पाच माओवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद

लतिहार/सासाराम, दि. १५ : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला केवळ एक दिवस शिल्लक असताना आणि या मतदानासाठी प्रचारतोफा थंडावल्या असताना बिहार आणि झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी वातावरण गरम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पोलिस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमकीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये सुरक्षा रक्षकांनी पाच माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या चकमकीत सीआरपीएफचा जवान शहीद झाला असून अपहरण करण्यात आलेल्या बसचा चालक व वाहक या दोघांना नक्षलवाद्यांनी ठार मारले. या संपूर्ण घटनेत सात जण जखमी झाले आहेत.
झारखंडमध्ये रांचीपासून सुमारे १२५ किमी दूर असणाऱ्या लतिहार या नक्षलप्रभावीत भागातील पलामू क्षेत्रात गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष मतदान केंद्राकडे जाणाऱ्या एका रिकाम्या बसला भूसुरुंग स्फोटात उडवून देण्यात आल्यामुळे बसमधील चालक व वाहक जागीच ठार झाले. या स्फोटानंतर लगेच सीआरपीएफच्या ८० जवानांनी घटनास्थळाची मोर्चेबांधणी केली आणि नक्षलवाद्यांवर हल्ला केला, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक एस. एन. प्रधान यांनी दिली.
नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा कॉन्स्टेबल धर्मेंद्र यादव शहीद झाला, तर पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सीआरपीएफचे जवान यशस्वी झाले, असेही त्यांनी सांगितले. या घटनेत सीआरपीएफचे पाच जवान जखमी झाले असल्याचेही ते म्हणाले.
अन्य एका घटनेत बिहार राज्यातील रोहतास जिल्ह्यातील ७० जवान व अधिकाऱ्यांच्या एका शिबिरावर सुमारे दोनशे नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केला. निवडणुकीतील सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने हे शिबिर उभे करण्यात आले होते. या घटनेत एक जवान जखमी झाला असल्याची माहिती पाटणापासून २०० किमी दूर अंतरावर असलेल्या सासाराम येथे पोलिस अधीक्षक विकास वैभव यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणाऱ्या नक्षलवादी संघटनेच्या हल्लेखोरांनी मध्यरात्री सुमारे दीड वाजताच्या सुमारास धांसा घाटातील रोहतासगढ किल्ल्याजवळ बीएसएफच्या शिबिराला घेरून त्यांच्यावर हल्ला केला. प्रत्युत्तरात बीएसएफ जवानांनी गोळीबार केला. ही चकमक सुमारे साडेतीन तास चालली, असे अतिरिक्त पोलिस महासंचालक नीलमणी यांनी पाटणा येथे सांगितले.
या घटनेत जखमी झालेल्या बीएसएफ जवानाला पाटणा मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी आणण्यात आले आहे. या जवानाची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असेही त्यांनी सांगितले.
या घटनेत काही नक्षलवादीही जखमी झाले असल्याची माहिती आहे. जखमींना ओढून नेण्यात आले असल्याचे आढळून आल्यामुळेच हे लक्षात आले. या घटनेत कोणाचाही मृतदेह हाती लागला नसल्यामुळे घटनेत कोणीही ठार झाले नसावे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत यंदा प्रथमच बुधुआ आणि रोहतासगढ किल्याजवळील धांसा येथे विशेष मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. आजूबाजूच्या परिसरातील लोकांना मतदान करणे सोयीचे व्हावे म्हणून दोन्ही ठिकाणी हे तात्पुरते मतदान केंद्र उभारण्यात आले आहे, असे कळते.

No comments: