Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 17 April, 2009

हरिप्रसाद यांच्याविरुद्ध भाजपची तक्रार दाखल

पणजी, दि.१६ (प्रतिनिधी)- गोवा प्रदेश भाजपच्यावतीने आज कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी तथा गोव्याचे निरीक्षक बी. के. हरिप्रसाद यांच्या विरोधात पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हरिप्रसाद यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व सध्याचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांना अरबी समुद्रात बुडवा, असे प्रक्षोभक वक्तव्य केले होते. हरिप्रसाद यांच्या या वक्तव्यामुळे देशभरातील भाजप कार्यकर्ते व या दोन्ही नेत्यांवर श्रद्धा असलेल्या समस्त जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप विधिमंडळ गटाचे उपनेते तथा म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी ही माहिती दिली. यावेळी मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर व सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते. पत्रकारांशी बोलताना श्री. डिसोझा पुढे म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा देशाच्या राजकारणासाठी वाहिला आहे. भारतीय राजकारणात त्यांनी दिलेल्या योगदानाची कदर न करता हरिप्रसाद यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मुळात भाजपचे युवा नेते वरुण गांधी यांच्यावर जर "राष्ट्रीय सुरक्षा कायदा' लागू होतो तर हरिप्रसाद यांच्यावरही हा कायदा लागू करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या तक्रारीसोबत हरिप्रसाद यांच्या या तथाकथित वक्तव्याबाबतच्या बातम्यांची कात्रणेही जोडलेली आहेत.
वाजपेयींबाबत आकस का?
माजी पंतप्रधान तथा भाजपचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी हे सध्या आजारी आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ते सहभागी झाले नाहीत. त्यांनी या काळात कॉंग्रेस किंवा कॉंग्रेसच्या नेत्यांवर टीकाही केल्याचे कोठेच ऐकिवात नाही. अशावेळी विनाकारण वाजपेयी यांचे नाव घेऊन त्यांच्यावर टीका करण्याइतपत आकस हरिप्रसाद यांना का, असा सवाल आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला. हरिप्रसाद यांना राष्ट्रीय राजकारणाची जाणीव नसल्यानेच त्यांच्याकडून हे बेजबाबदारपणाचे वक्तव्य करण्यात आले. त्यांचा राजकारणाचा अभ्यास कच्चा असेल तर त्यांनी मूग गिळून गप्प राहणेच उचित असल्याचा टोलाही यावेळी त्यांनी हाणला.

No comments: