Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 14 April, 2009

वरुणच्या याचिकेवर १६ रोजी सुनावणी

नवी दिल्ली, दि. १३ : पिलिभीतमध्ये भडकावू भाषण दिल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत तुरुंगात असलेले भाजप नेता वरुण गांधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणत्याही प्रकारचे भडकावू भाषण देणार नाही, अशा आशयाचे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयास देण्यास राजी झाले आहेत.
वरुण गांधींचा जामीन मंजूर झाला तर त्यांना "कोणत्याही प्रकारचे भडकावू भाषण देणार नाही', अशा आशयाचे शपथपत्र द्यावे लागेल, असा सल्ला मुख्य न्यायाधीश के. जी. बाळकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने दिला आहे. उत्तरप्रदेश सरकारच्या वकिलांनी या सल्ल्याबाबत सहमती व्यक्त केली असून याप्रकरणी सुनावणी १६ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
पिलिभीतमध्ये भडकावू भाषण देणे आणि आत्मसमर्पणाच्या वेळी तेथील लोकव्यवस्था भंग होण्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांद्वारे लागू राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचे कलम ३-२ रद्द करण्यासाठी वरुण गांधी सर्वोच्च न्यायालयात गेले होते.
मात्र, राज्य सरकारने वरुण गांधींचे आरोप नाकारले होते. ३५ पानी आपल्या उत्तरात सरकारने सांगितले होते की सांप्रदायिक भाषण करणे आणि २८ मार्चला पिलिभीतमध्ये आत्मसमर्पणाच्या दिवशी लोक व्यवस्था भंग करण्याप्रकरणी त्यांच्या विरोधात रासुका लावण्यात आला. सरकारने न्यायालयाला सांगितले होते की वरुणने ज्याप्रमाणे भडकावू भाषण दिले आणि २८ मार्चला आत्मसमर्पणाच्या दिवशी लोकव्यवस्था भंग केली, त्यामुळे त्यांच्या विरोधात रासुका लावणे आवश्यक झाले होते.

No comments: