Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 18 April, 2009

मतांची टक्केवारी वाढून दक्षिणेत विजय निश्चित

पर्रीकर यांना विश्वास
मडगाव, दि. १७ (प्रतिनिधी) : दक्षिण गोव्यात गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपच्या मतांत ४ ते ५ टक्के वाढ अपेक्षित आहे. गेल्या वेळी येथे भाजपला ३२-३३ टक्के मते मिळाली होती. हे प्रमाण यावेळी ४० ते ४५ टक्क्यांवर जाईल व भाजपचे उमेदवार ऍड. नरेंद्र सावईकर निश्चितपणे निवडून येतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत व्यक्त केला. आमदार दामोदर नाईक व पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे निमंत्रक सिद्धनाथ बुयांव यावेळी उपस्थित होते.
रमाकांत आंगले निवडून आले होते तेव्हा भाजपला एकूण मतदानापैकी ४० टक्के मते प्राप्त झाली होती. तेव्हापासून दक्षिण गोव्यात व प्रामुख्याने सासष्टीत भाजपला मिळणाऱ्या मतांचे प्रमाण सतत वाढतच असल्याचे श्री. पर्रीकर यांनी सांगितले. एका प्रश्र्नावर, सालसेत मिशन हे वृत्तपत्रांनी तयार केलेला "स्टंट' असून भाजपने प्रत्यक्षात अशी मोहीम हाती घेतलीच नव्हती असे त्यांनी स्पष्ट केले. काही निवडणुकांत मतदान जरी कमी झालेले असले तरी भाजपची मते वाढलेली आहेत. यंदा लोकांकडून मिळत असलेला प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचे सांगून उशिरा तसेच रात्र झालेली असली तरीही लोक प्रतीक्षा करत असल्याची उदाहरणे त्यांनी दिली.
सीआरझेड प्रकरणी भाजपने विधानसभेत आधीच आवाज उठवला होता पण सरकारने त्यावेळी तो विषय गांभीर्याने घेतला नव्हता, त्याला काही प्रमाणात ऍडव्होकेट जनरलही जबाबदार असल्याचे श्री. पर्रीकर यांनी सांगितले.
युगोडेपा हा गोव्यात तरी भाजपपेक्षाही जुना व लोकांपर्यंत पोहोचलेला पक्ष असल्याचे सांगताना कॉंग्रेसविरोधी मते वळविण्यासाठी भाजपनेच त्याला निवडणूक आखाड्यात उतरवल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले. या पक्षाकडे जाणारी कॉंग्रेसविरोधी मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यात प्रचार शिगेला पोचलेला असून भाजपने आजवर हजाराहून अधिक कोपरा सभा घेतल्याचे तसेच ऍड. सावईकर नवा चेहरा असला तरी त्यांची उमेदवारी आधीच जाहीर झाल्याने मतदारसंघातील कोपरा न कोपरा त्यांनी पालथा घातला आहे. यामुळे ते सर्वपरिचित झाल्याचे श्री. पर्रीकर म्हणाले.
देशांतील अंतर्गत सुरक्षा, गगनाला भिडलेली महागाई, ढासळलेली आर्थिक व्यवस्था याबद्दल श्री. पर्रीकर यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. केंद्रातील संपुआ सरकारचा कोणावरही वचक नाही हेच यावरून सिद्ध होत आहे. गोव्यातील बंद पडू लागलेले कारखाने व त्यातून निर्माण होत असलेली बेरोजगारी याचाही त्यांनी या संदर्भात उल्लेख केला. पहिल्या टप्प्यातील मतदानात झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख करून यावेळचे लक्ष्य मतदार नव्हे तर निवडणूक अधिकारी व सुरक्षा दले होते व ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांनी अफजल गुरु बाबत तत्कालीन वाजपेयी सरकारवर ठपका ठेवण्याच्या कृतीला त्यांनी आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयाने साडेतीन वर्षांपूर्वी त्याला फाशीची शिक्षा देण्यावर शिक्कामोर्तब केले त्यावेळी केंद्रात संपुआ सरकार सत्तेवर होते. याची आठवण त्यांनी करून दिली.
"सिदाद दी गोवा' प्रकरणी आपली भूमिका सुस्पष्ट आहे असे सांगताना अशा प्रकरणात आपण जात पात मानत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्याचे हितसंबंध सर्वांत महत्त्वाचे असतात असे सांगून राधाराव ग्रासियस यांनी केलेला आरोप श्री. पर्रीकर यांनी फेटाळला.

मुख्यमंत्र्यांकडील असेही मतदार

मुख्यमंत्र्यांच्या मालभाट निवासस्थानाकडे गेलो तर ते पाकिस्तानी पंतप्रधानांचे निवासस्थान आहे की काय, असा भास होत असल्याची टिप्पणी युगोडेपाचे राधाराव ग्रासियस यांनी केली होती. यावर लक्ष वेधताना पर्रीकर यांनी याहून गंभीर प्रकाराचा खुलासा केला. मुख्यमंत्र्यांच्या "त्या' निवासस्थानाच्या पत्त्यावर नोंदणी झालेल्या ७ मतदारांची नावे तपासली तर हा काय प्रकार आहे, असाच प्रश्र्न तुम्हाला पडेल, असे ते म्हणाले. या नावांबाबत आक्षेप घेऊन केलेला अर्ज सासष्टी मामलेदारांनी फेटाळून लावला आहे व यावरून मतांसाठी कोणकोणते प्रकार सुरू आहेत, मुख्यमंत्र्यांच्या निवासात कोण कोण राहतात ते स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना या प्रकरणी पत्रकारांनी छेडले असता, आपल्या घरी गेली १५ वर्षे काम करणारी मोलकरीण व तिच्या कुटुंबीयांची असल्याचे सांगितले. आपल्या निवासाच्या वरच्या मजल्यावर आपल्याच मालकीच्या फ्लॅटमध्ये हे लोक राहतात व आपल्या घरची सर्व कामे करतात. त्यांनी कायद्यानुसारच मतदार म्हणून नोंदणी केलेली आहे, असेही ते म्हणाले.

No comments: