Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 13 April, 2009

धर्म रक्षणासाठी संस्कृत शिका - ब्रह्मेशानंदाचार्य

फोंडा, दि.१२ (प्रतिनिधी) - धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी संस्कृत भाषा शिकणे आवश्यक आहे. ही भाषा म्हणजे ज्ञानाचा महासागर असून या महासागरातील ज्ञान ग्रहण करण्यासाठी तिचे अध्ययन करणे आवश्यक आहे. प.पू. श्री पद्मनाभ शिष्य संप्रदाय संचालित श्री ब्रह्मानंद संस्कृती प्रबोधिनीतर्फे गावोगावी संस्कृत भाषेच्या शिक्षणासाठी पाठशाळा सुरू करण्यात आलेल्या असून या पाठशाळांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प.पू. ब्रहेशानंद स्वामी यांनी आज(दि.१२) संध्याकाळी तपोभूमी कुंडई येथे संस्कृत महासंमेलनाच्या सांगता सोहळ्यात बोलताना केले आहे.
या संस्कृत महासंमेलनाच्या सांगता सोहळ्याला शिक्षण खात्याचे उपसंचालक अनिल पवार, नागराज होन्नेकेरी, उद्योजक सोमकांत नाणूसकर, आचार्य भवानी शंकर पटेल, आचार्य प्रसाद द्विवेदी, आचार्य नवराज भट्ट, संप्रदायाचे अध्यक्ष गुरूदास शिरोडकर, ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनीचे अध्यक्ष उल्हास शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्कृत भाषेच्या अभ्यासामुळे मनुष्याचे आचरण सुसंस्कृत होऊ शकते. संस्कृत भाषा ही ज्ञानाचा महासागर आहे. त्या भाषेतील दडलेले ज्ञान आत्मसात करण्यासाठी संस्कृत भाषेचे अध्ययन आवश्यक आहे, असे सांगून स्वामी ब्रह्मेशानंद म्हणाले की, प्रत्येक घराघरात संस्कृत भाषा पोहोचली पाहिजे. तपोभूमी ही आध्यात्मिक ज्ञानाचे मार्गदर्शन करणारी भूमी आहे. या ठिकाणी ब्रह्मानंद, सच्चिदानंद दडलेले असून त्याचा उपयोग घ्या व आनंदाने जीवन जगा, असेही स्वामींनी सांगितले.
संस्कृत भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन ब्रह्मीभूत ब्रह्मानंद स्वामींनी संस्कृत गंगोत्री गावो गावी आणि घरोघरी पोहोचविण्यासाठी पाठशाळा सुरू केल्या. संस्कृत भाषा ही सोपी भाषा आहे. या संस्कृत भाषेसंबंधी सोप्या भाषेत माहिती देण्यासाठी एक पुस्तिका सुध्दा तयार करण्यात आलेली आहे. संस्कृत आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सर्वांनी कटिबद्ध झाले पाहिजे, असेही स्वामींनी सांगितले.
संस्कृत ही देवभाषा आहे. संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी ब्रह्मानंद प्रबोधिनीने सुरू केलेले कार्य कौस्तुकास्पद असून संस्कृत भाषेच्या संवर्धन व शिक्षणासाठी शिक्षण खात्याकडून प्रयत्न केले जातील, असे शिक्षण खात्याचे उपसंचालक अनिल पवार यांनी सांगितले. संस्कृत ही सर्व भाषांची जननी असली तरी ह्या भाषेला इतर भाषा एवढी मान्यता मिळाली नाही. धार्मिक कार्यामुळे ही भाषा टिकून राहिलेली आहे. या संस्कृत भाषेला गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे. संस्कृत भाषेच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने संस्कृत भाषा शिकणे आवश्यक आहे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.
देश आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी संस्कृत भाषेचे संवर्धन आवश्यक आहे. संभाषण शिबिरे व इतर माध्यमातून ह्या भाषेचे संवर्धन होऊ शकते, असे शिक्षण उपसंचालक नागराज होन्नकेरी यांनी सांगितले. तरुणांनी स्वाभिमान व संस्कृत भाषा रक्षणाचा निश्चय करून काम केले पाहिजे, असे उद्योजक सोमकांत नाणूसकर यांनी सांगितले.
उल्हास शिरोडकर यांनी प्रास्ताविक केले. गुरूदास शिरोडकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रबोधिनीच्या विविध पाठशाळांत विद्यादान करणारे शिक्षक व शिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. "दिव्या गिर्वाणभारती' या पुस्तिकेचे प्रकाशन गुरूदास शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. शेवटी सावळो नाईक यांनी आभार मानले. सूत्रसंचालन बहु श्री सतीश वर्मा व कु. प्रतिमा गावडे यांनी केले. पसायदानाने संमेलनाची सांगता झाली.
या महासंमेलाचा शुभारंभ सकाळी १०.३० वाजता प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी यांच्या उपस्थितीत विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आला. या संमेलनाच्या सकाळ व संध्याकाळच्या सत्रात संस्कृत पाठशाळेच्या मुलांनी विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रम संस्कृत भाषेतून सादर केले. या संमेलनात संस्कृत प्रबोधिनीच्या पाठशाळांतील विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते.

No comments: