Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 17 April, 2009

वरुण गांधी यांची पॅरोलवर सुटका

नवी दिल्ली, दि. १६ - "रासुका'अंतर्गत अटकेत असणाऱ्या वरुण गांधी यांची आज सर्वोच्च न्यायालयाने पॅरोलवर सुटका केली. दोन आठवड्यांसाठी वरुण गांधी यांना तुरुंगातून मुक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडून यापुढे प्रक्षोभक भाषण देणार नाही, असे शपथपत्र लिहून घेतले आहे.
२९ मार्चपासून वरुण गांधी एटा कारागृहात होते. तेथूनच त्यांनी यापुढे प्रक्षोभक भाषण करणार नाही, असे शपथपत्र लिहून दिले होते. सरन्यायाधीश के.जी.बालकृष्णन यांच्या नेतृत्वातील न्यायासनाने हे शपथपत्र देण्याविषयी एटा कारागृह प्रशासनाला सांगितले होते. सुटकेनंतर वरुण गांधी यांना असेच शपथपत्र सर्वोच्च न्यायालयातही द्यावे लागणार आहे.
मुस्लिम समुदायाविषयी प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी उत्तरप्रदेश प्रशासनाने वरुण गांधी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केली होती. उत्तरप्रदेश सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका वरुण गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने प्रक्षोभक भाषणे देणार नाही, असे शपथपत्र दिले तर सुटकेबाबत विचार केला जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार आज न्यायालयाने वरुण गांधी यांची दोन आठवड्यांच्या पॅरोलवर सुटका केली.
पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज
सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता का होईना पण, पॅरोलचा दोन आठवड्यांचा दिलासा मिळाल्यानंतर वरुण गांधी पुढील आठवड्यात आपला उमेदवारी अर्ज सादर करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पिलीभीत येथून भाजपचे उमेदवार असणारे वरुण गांधी सोमवारी किंवा मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी शक्यता भाजपाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. वरुणची आई मनेका गांधी या उत्तरप्रदेशातील औनला येथून शनिवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज कधी दाखल करायचा याविषयी दोघांनीही वैयक्तिक स्तरावर निर्णय घेतला असून पक्षाने याबाबत कोणताही हस्तक्षेप केला नसल्याचे समजते.
मात्र, भाजपने दोन आठवड्यांच्या पॅरोलच्या काळात वरुण गांधी यांना प्रचारासाठी उतरविण्याचे संकेत दिले आहेत.

No comments: