Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 14 April, 2009

सत्यम्ला केले महिंद्राने "टेक ओव्हर'

२,९०० कोटी रुपये मोजून घेतले ५१ टक्के शेअर्स
मुंबई, दि. १३ : सत्यम् ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी आज सकाळी झालेल्या लिलावात लार्सन अँड टुब्रो या कंपनीला मागे टाकत "टेक महिंद्रा'ने सर्वाधिक बोली लावत सत्यम् कंपनीचे ५१ टक्के शेअर्स विकत घेण्यासाठी २९०० कोटी रुपये मोजले. सत्यम्च्या शेअर्सची ५८ रुपये प्रती शेअर अशी बोली लावून सत्यम् कंपनी विकत घेतली आहे. लार्सन अँड टुब्रोनेही प्रती शेअर ४५.९० रुपये मोजण्याची तयारी दर्शविली होती, तर अमेरिकन कंपनी विल्बर रॉस या कंपनीने प्रती शेअर २० रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, अखेर ५८ रुपये मोजून टेक महिंद्राने सत्यम् कंपनी आपल्या ताब्यात घेतली आहे.
ऑक्टोबर २००८ मध्ये सत्यम् कॉम्प्युटर्समध्ये ६००० कोटी रुपयांचा घोटाळा करून सत्यम्चे मालक रामलिंग राजूने भारतीय कॉर्पोरेट जगताला हादरवून सोडले होते. या घोटाळ्यातून सावरण्यासाठी केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने किरण कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली एक नवे मंडळ स्थापन केले होेते. कर्णिक व दीपक पारेख यांच्या पुढाकारानेच गेले तीन महिने सत्यम्चा मालक शोधण्याची प्रक्रिया सुरू होती.
आज सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या सत्यम्च्या लिलाव प्रक्रियेत तीन प्रमुख दावेदार होते. त्यांपैकी टेक महिंद्रा व लार्सन अँड टुब्रो हे दोन प्रमुख दावेदार ठरले. लार्सन ऍण्ड टुब्रोने प्रती शेअर ४५.९० रुपये बोली लावली. लिलावाच्या प्रक्रियेतील प्राथमिक अटींनुसार पहिल्या व दुसऱ्या बोलीमध्ये जर दहा टक्क्यांपेक्षा कमी अंतर असेल तरच दुसरी बोली लावणाऱ्याला पुन्हा संधी देण्यात येणार होती. पण, टेक महिंद्रा आणि लार्सन अँड टुब्रो यांच्यातील बोलींमधील अंतर ११ टक्क्यांहून अधिक निघाल्याने टेक महिंद्रा सत्यम्चे नवे मालक ठरले. टेक महिंद्राने केलेल्या या खरेदीमुळे आता टेक महिंद्रा भारतातील चौथी सर्वांत मोठी आयटी कंपनी होणार आहे.

No comments: