Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 15 April, 2009

पहिल्या टप्प्यातील प्रचार थांबला, उद्या मतदान

१७१५ उमेदवार अजमावत आहे भाग्य
नवी दिल्ली, दि. १४ : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज थांबला. येत्या १६ एप्रिल रोजी १७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील १२४ लोकसभा मतदारसंघांमध्ये या पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहेत. विदर्भातील लोकसभेच्या दहाही मतदारसंघात जाहीर प्रचार आज संपला.
पहिल्या टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेते, गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असणारे आणि काही चित्रपट कलावंत यांचे भाग्य मशीनबंद होणार आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी १७१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यात भाजपच्या १०२, कॉंग्रेसच्या १११ आणि बसपच्या १११ उमेदवारांचा समावेश आहे. या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत प्रामुख्याने कॉंग्रेस आणि भाजप या दोनच राष्ट्रीय पक्षांमध्ये मुकाबला दिसून येणार आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव, भाजपचे डॉ. मुरली मनोहर जोशी, तेलंगणा पार्टीचे चंद्रशेखर राव, कॉंग्रेसच्या रेणुका चौधरी, अभिनेत्री विजयशांती, अभिनेता मनोज तिवारी, एनटीआरची कन्या पी. पुरंदेश्वरी, माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांच्या भाग्याचा निर्णय या पहिल्या टप्प्यातील मतदानावरच अवलंबून राहणार आहे.
महाराष्ट्रातील ४८ पैकी १३ मतदारसंघांमध्ये येत्या १६ एप्रिल रोजी मतदान होणार असल्यामुळे या सर्वच ठिकाणचा प्रचार आज संपला. यात विदर्भातील सर्वच्या सर्व म्हणजे दहाही जागांचा समावेश आहे.
महाराष्ट्राशिवाय छत्तीसगडमधील ११, बिहारमधील १३, केरळमधील २०, आंध्र प्रदेशात २२, उत्तर प्रदेशात १६, ओरिसातील १० आणि झारखंडमधील ६ जागांवर १६ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.

No comments: