Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 13 April, 2009

भाजपला सत्तेवर आणल्यास अनुसूचित जातींचे कल्याण

पर्रीकर यांचे ठोस आश्वासन

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - अनुसूचित जातींना सरकारी नोकरीत तसेच उच्च शिक्षणात राखीवतेची गरज होती तेव्हा कॉंग्रेस सरकारने १५ टक्के असलेली राखीवता कमी करून २ टक्के केली. केंद्रात आणि राज्यात कॉंग्रेस सरकारने नेहमीच मागासवर्गीयांवर अन्याय केला आहे. तथापि, भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास मागासवर्गीयांना कोणत्याही मदतीसाठी शासनाकडे याचना करावी लागणार नाही, असे कार्य केले जाईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिली. ते आज पर्वरीतील आझाद भवनात भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे आयोजित सभेत बोलत होते.
व्यासपीठावर पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे, माजी आमदार राजेंद्र आर्लेकर, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष विठू मोरजकर व प्रेमानंद तळवडकर उपस्थित होते. यावेळी संमत केलेल्या ठरावाची प्रत माजी आमदार राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे सुर्पूत करण्यात आली.
केवळ निवडणुकीपुरता आयोजलेला हा कार्यक्रम नसून मागासवर्गांच्या उद्धारासाठी भाजप सतत कार्यरत असून यापुढेही या समाजासाठी असलेल्या योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी जागृती मोहीम चालवली जाणार आहे. कॉंग्रेसने या योजनांचे वाटोळे केले आहे. त्यामुळे केंद्राकडून येणारा लाखोंचा निधी वापराविना परत जात आहे. मागासवर्गीय अशिक्षित होते त्यावेळी उच्च शिक्षण घेण्यासाठी १५ टक्के राखीवता होती. आज या समाजातील तरुणाईने शिक्षण घेतले आहे. त्यांना नोकरीची गरज आहे. अशा वेळी कॉंग्रेस सरकारने राखीवतेत कपात करून ती १५ टक्क्यांवरून थेट २ टक्क्यावर आणली असल्याची टीका पर्रीकर केली. भाजप सत्तेवर येताच पुन्हा त्यात वाढ केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
कॉंग्रेस सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मानहानी केली आहे. विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षासह अन्य पक्षांनी मागणी केल्यानंतर डॉ.आंबेडकरांना "भारतरत्न' पुरस्कार बहाल करण्यात आला. ज्या महान व्यक्तीने भारताची घटना बनवली अशा विभूतीला त्याकाळी कॉंग्रेस पक्षाचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यास विरोध केला, याची आठवण राजेंद्र आर्लेकर यांनी करून दिली. सध्या कॉंग्रेस सरकारने अनुसूचित जाती राखीवतेत मुसलमान व ख्रिश्चनांना राखीवता देण्याचा प्रयत्न करीत आहे. तसे झाल्यास अनुसूचित जातीला नोकऱ्याच मिळणार नाही. यावेळी मतदान करताना आम्ही पुन्हा चूक केल्यास हेच नालायक कॉंग्रेस सरकार आमच्या डोक्यावर बसणार असल्याचे आर्लेकर यांनी निक्षून सांगितले. पर्रीकरांच्या मार्गदर्शनाखाली भाजप सरकारने डॉ. आंबेडकरांच्या नावाने सुरू केली "आवास योजने'ला या कॉंग्रेस सरकारने कचऱ्याची टोपली दाखवली. कॉंग्रेसला यापुढे सहन करणे कठीण आहे. सामाजिक सुरक्षेबरोबर आम्हाला राष्ट्रीय सुरक्षा पाहिजे. ती केवळ लालकृष्ण अडवाणीच देऊ शकतात. त्यासाठी उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक व दक्षिण गोव्यातून ऍड. नरेंद्र सावईकर यांना विजयी करा, असे आवाहन आर्लेकर यांनी केले.
अनुसूचित जातीच्या अनेक समस्या आहेत. कॉंग्रेस सरकारच्या दुर्लक्षामुळेच हा समाज मागास राहिला आहे. प्रत्येक महामंडळात या समाजासाठी आरक्षण असले पाहिजे. कॉंग्रेस सरकार केवळ मतांचे राजकारण करत असल्याची टीका विठू मोरजकर यांनी स्वागतपर भाषणात केली. यावेळी उत्तर गोव्यातील समाजबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नीळकंठ मोरजकर यांनी केले. प्रेमानंद तळवडकर यांनी आभार मानले.

ठरावातील मुद्दे ः
उच्च शिक्षणात पुन्हा ८ टक्के वाढ देण्याची मागणी.
सरकारी खात्यात असलेली सर्व राखीव जागा त्वरित भराव्यात.
सरकारी महामंडळातर्फे जागेचे वाटप करताना तसेच या महामंडळात नोकरीत अनुसूचित जातीसाठी आरक्षण ठेवावे.
उच्च शिक्षणासाठी व्याजमुक्त कर्ज तसेच बांधकामासाठी कमी व्याजात कर्ज द्यावे.
अनुसूचित जाती व जमातींसाठी वेगळे महामंडळ असावे.
पंच व नगरसेवकांमार्फत पुन्हा मागासवर्गीयांचे सर्वेक्षण केले जावे.
सर्व सरकारी इस्पितळात आयुर्वेदिक व होमिओपॅथिक केंद्र सुरू करून त्यात डॉक्टरांची नेमणूक केली जावी.
"भारतरत्न' डॉ. बाबासाहेब यांच्या नावाने मागासवर्गींयासाठी पर्वरी येथे भवनाची उभारणी केली जावी.

No comments: