Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 17 April, 2009

पाच राज्यांमध्ये हिंसाचारात १७ ठार

पहिल्याच दिवशी मतदान रोखण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न

..राजनांदगावमध्ये पाच निवडणूक अधिकारी ठार
..लतिहारमध्ये सात बीएसएफ जवान शहीद
..ओरिसात मतदान केंद्र व "इव्हीएम' जाळल्या


रांची, लतिहार, गया, भुवनेश्वर, दि. १६ - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया सुरू होताच देशाच्या विविध भागात नक्षलवादीही सक्रीय झाले असून निवडणूक प्रक्रियेत अडथळे आणण्याच्या प्रयत्नांतर्गत त्यांनी महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि ओरिसात बॉम्ब व शस्त्रांनी भीषण हल्ला चढविला. यात पाच निवडणूक अधिकारी आणि सुरक्षा दलाच्या दहा जवानांसह १७ जण ठार तर अनेक जण जखमी झालेत. नक्षलवाद्यांनी काही ठिकाणी मतदानयंत्रे पळवून नेली तर काही मतदान केंद्रांना आग लावली.
झारखंडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात सात जवान शहीद झाले असून छत्तीसगडमधील हल्ल्यात पाच निवडणूक अधिकारी ठार झाले आहेत.
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील मिसगाव येथे नक्षलवाद्यांनी निवडणूक प्रक्रिया उधळून लावण्यासाठी मतदान केंद्रावर हल्ला चढविला. भीषण गोळीबार करीत पुढे सरकत असलेल्या नक्षलवाद्यांवर तुटून पडताना सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी त्यांना मागे पिटाळले. तब्बल अर्धा तास पोलिस व नक्षवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. अखेर पोलिसांच्या सामर्थ्यापुढे आपल्याला येथे टीकाव धरणे शक्य नाही असे ध्यानात येताच डिटोनेटर्स आणि निवडणूक विरोधी साहित्य तेथेच टाकून नक्षलवाद्यांनी पळ काढला. पोलिसांनी स्फोटके व शस्त्रांचा हा साठा जप्त केला आहे.
छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यात निवडणूक अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला नक्षलवाद्यांनी शक्तिशाली स्फोटकांनी उडवले. या हल्ल्यात पाच निवडणूक अधिकारी जागीच मारले गेले तर अन्य दोघे जखमी झाले. राज्यातील दंतेवाडा व नारायणपूर क्षेत्रातील मतदान केंद्रांवरही नक्षल्यांनी हल्ला चढवला व सुरक्षा दलांवर गोळ्या झाडल्या. दंतेवाडा जिल्ह्यातील मारूकी येथे नक्षवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका सीआरपीएफ जवानाचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र यात नक्षलवाद्यांना नुकसान झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.
नक्षवाद्यांनी छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील नरनार, सोनापाल आणि करमारी तसेच दंतेवाडा जिल्ह्यातील मंगनार व जंगामपाल गावांवर हल्ला चढवल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक गिरधारी नायक यांनी दिली.
सीआरपीएफवर हल्ला चढविल्यानंतर एका दिवसाने माओवाद्यांनी झारखंड राज्याच्या लतिहार जिल्ह्यात सकाळी ७.३० वाजता बीएसएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला शक्तिशाली भूसुरुंग पेरून स्फोटकांद्वारे उडवले. यात सीमा सुरक्षा दलाचे सात जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात बसचा असैनिक चालक व मदतनीसही मारला गेला. शिवाय अन्य काही जवान जखमी झाले. रांची येथून १२५ कि.मी.अंतरावर असलेल्या तालिहार जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा गढ असलेल्या लाधुप येथून गस्त घालून बीएसएफ जवान आराहकडे परत येत होते. मार्गात नक्षल्यांनी स्फोट घडवून त्यांचे वाहन उडवले. मदत व बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती तालिहारचे पोलिस उपायुक्त सर्वेन्दु तथागत यांनी दिली.
तिकडे बिहारच्या गया जिल्ह्यातील बांके बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंहपूर गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मतदान केंद्रावर तैनात गृहरक्षक दलाचा जवान व एक पोलिस असे दोघे प्रतिकार करताना शहीद झाले तर अन्य दोन पोलिस बेपत्ता आहेत.
ओरिसातील मलकानगिरी जिल्ह्यात नक्षल्यांनी तीन मतदान केंद्रांना आग लावली. यात "इव्हीएम' यंत्र (इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन) आणि निवडणूक साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे येथील मतदान प्रक्रियेवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. नागरिकांमध्ये दहशत पसरल्यामुळे ते मतदान करण्यासाठी घराबाहेर निघण्यालाही घाबरत होते. लोकसभा निवडणुकीच्या बहिष्काराचे आवाहन करणाऱ्या नक्षलवाद्यांनी चित्रकोंडा भागातील अंध्राल येथे हल्ला चढविला. निवडणूक अधिकाऱ्यांचे हात व पाय बांधून साहित्य पोचवणारे वाहन व दोन "इव्हीएम'ला आग लावल्याची माहिती मलकानगिरीचे जिल्हाधिकारी नितीन भानुदास जावळे यांनी दिली. या हल्ल्यांमुळे येथील मतदान केंद्रांवर मतदानच झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
कालिमेला पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सलिमरीकोंडा तसेच एमव्ही ७३ क्षेत्रात माओवाद्यांनी दोन मतदान केंद्रांना आगीच्या हवाली केले. "इव्हीएम' बाहेर आणून त्यांनाही आग लावली. माओवाद्यांनी जिल्ह्यातील माथिली क्षेत्रात निवडणूक अधिकारी व मतदारांना मतदानापासून रोखण्यासाठी मोठे वृक्ष कापून रस्त्यांवर आडवे पाडले. त्याचप्रमाणे काही ठिकाणी मोठे खडक रस्त्यांवर पाडल्यामुळे मार्गात अथळा निर्माण झाला. माओवाद्यांच्या धमकीमुळे कालिमेला भागातील बादिगाटा मतदान केंद्रावर मतदानाच्या प्रारंभिक दोन तासात मतदारच फिरकले नाहीत. दिवसभरात येथे एकही मत पडले नाही. जिल्ह्यातील अन्य भागातही मतदानाची टक्केवारी फारच कमी राहिली. विशेषत: चित्रकोंडा व मलकानगिरी मतदारसंघात फारच कमी टक्केवारी राहिल्याचे पोलिस अधीक्षक सत्यव्रत भोई यांनी सांगितले.

No comments: