Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 16 April, 2009

पहिल्या टप्प्यातील मतदान आज

नवी दिल्ली, दि. १५ : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात २४ राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण १२४ जागांसाठी मतदान घेतले जात असून त्यात अनेक दिग्गजांच्या भाग्याचा निर्णय गुरुवारी मशीनबंद होणार आहे.
भाजप नेते डॉ. मुरली मनोहर जोशी, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, तेलंगण राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव, केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी, विलास मुत्तेमवार, एन.टी.रामाराव यांची कन्या डी. पुरंदेश्वरी आणि माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय हे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मुख्य उमेदवार आहेत. या टप्प्यात महाराष्ट्रातील ४८ पैकी १३ जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे. याशिवाय केरळमध्ये सर्व २० जागा, छत्तीसगड ११, उत्तरप्रदेश १६, आंध्रप्रदेश २२, झारखंड १४, बिहार १३, ओरिसा १०, आसाम ३, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय २, मणिपूर तसेच जम्मू-काश्मिरातील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होईल. अंदमान-निकोबार, लक्षद्वीप, मिझोरम आणि नागालॅण्ड येथेही एका जागेसाठी गुरुवारीच मतदान घेतले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात मतदान करणाऱ्यांना निकालासाठी एक महिन्याची वाट पाहावी लागणार आहे कारण मतांची मोजणी १६ मे रोजी होणार आहे. आंध्रप्रदेश आणि ओरिसा येथे विधानसभेसाठीही मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राज्यांमध्ये निमलष्करी दलासह राज्य सुरक्षा दलाचे जवानही सुरक्षेसाठी तैनात आहेत. गुन्हेगारी कारवायांना खीळ बसावी आणि दारूच्या विक्रीवर नियंत्रण असावे यासाठी राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. या पुढील टप्प्यातील मतदान २३ एप्रिल रोजी होणार आहे.

No comments: