डिचोली, दि. १५ (प्रतिनिधी)- भारताला विकसीत राष्ट्र बनवण्यासाठी देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे. गेली साठ वर्षे भारताला व्होटबॅंकच्या गलिच्छ राजकारणात डुंबवणाऱ्या कॉंग्रेसचे नामोनिशाण मिटवताना देशाच्या विकासासाठी भाजपला सत्तेवर आणण्याचे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
डिचोली येथील छत्रपती शिवाजी मैदानावर भाजपचे उत्तर गोवा लोकसभा उमेदवार खा. श्रीपाद नाईक यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, आमदार राजेश पाटणेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, अनंत शेट, दयानंद मांद्रेकर, फ्रान्सिस डिसोझा तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजपचे स्टार प्रचारक मोदी यांचे घणाघाती भाषण ऐकण्याच्या उद्देशाने मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
आज देशात दहशतवाद, भ्रष्टाचार, खून, बलात्कार, चोऱ्या आदी प्रकारांत प्रचंड वाढ झाली आहे. येथील सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग हे दुर्बळ पंतप्रधान असून देशाला लालकृष्ण अडवाणींसारख्या सक्षम नेतृत्वाची गरज आहे. देशाच्या संपत्तीवर येथील सामान्य नागरिकाचा हक्क आहे. सामान्य नागरिक कोणत्याही जातिधर्माचा का असेना, भाजप त्याला त्याचा हक्क प्राप्त करून देणारच, असे आश्वासन मोदी यांनी यावेळी दिले. आसामात व्होटबॅंकच्या आधारे बांगलादेशींची घुसखोरी सुरू आहे. गुजरातप्रमाणे देशभक्ती असलेले सरकारच दहशतवाद्यांना रोखू शकते असे सांगून मोदी यांनी देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.
मुंबईवरील हल्ल्यानंतर मदतीसाठी अमेरिकेकडे भीक मागणारे मनमोहनसिंग अर्थमंत्री असताना हर्षद मेहता घोटाळा प्रकरण झाले. आता ते पंतप्रधान असताना सत्यम घोटाळा उघडकीस आला. हे घोटाळे नियोजित पद्धतीने झाल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. २००७/२००८ आर्थिक वर्षातील "कॅग'च्या अहवालानुसार केंद्र सरकारच्या खजिन्यातून ५० हजार कोटी रुपयांचा हिशोब मिळत नसून हे पैसे कुठे गेले त्याचे उत्तर पंतप्रधानांनी देशवासीयांना द्यावे, असे आव्हान मोदी यांनी दिले.
गुजरातचा आर्थिक विकास दर, तसेच कृषी प्रगती ही आशियात प्रथम क्रमांकावर असून गुजरातप्रमाणेच भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतर संपूर्ण देशाचा झपाट्याने विकास होईल. तसेच देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
आपल्या जाहीरनाम्यात तीन रुपये किलो दराने गहू देण्याचे आश्वासन कॉंग्रेसने दिले आहे. गेली पाच वर्षे सरकारला हे काम का जमले नाही, असा प्रश्न विचारून गुजरातमध्ये गेली सात वर्षे आपले सरकार दोन रुपये दराने गहू देत आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या दीड तासाच्या घणाघाती भाषणात भाषणात मोदी यांनी पंतप्रधान डॉ. सिंग, श्रीमती सोनिया गांधी, शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली.
सेझ, खास दर्जा आदींबाबत आता कॉंग्रेस नेते आश्वासनांची खैरात करीत आहेत, गेल्या चारपाच वर्षांत हे करणे कॉंग्रेस सरकारला का जमले नाही, आता आश्वासने देत जनतेची दिशाभूल केली जात आहे, असे यावेळी बोलताना मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. मोदी यांच्या भाषणापूर्वी खासदार श्रीपाद नाईक, नगराध्यक्ष सतीश गावकर व अन्य नेत्यांची भाषणे झाली.
क्षणचित्रे...
- नरेंद्र मोदींचे आगमन झाले तेव्हा त्यांच्या जयजयकाराने
छत्रपती शिवाजी महाराज मैदान दणाणून गेले.
- व्यासपीठ आकर्षकरीत्या फुलांनी सजवण्यात आले होते.
- ही सभा आत्तापर्यंतची सर्वांत भव्य व ऐतिहासिक ठरली.
- मैदान खचाखच भरल्यामुळे बाहेरही लोक मोदींचे भाषण
कान देऊन ऐकत असल्याचे चित्र दिसत होते.
- मोदी यांच्या भाषणापूर्वी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, खासदार श्रीपाद नाईक, नगराध्यक्ष सतीश गावकर व अन्य नेत्यांची भाषणे झाली.
- आमदार राजेश पाटणेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
- या सभेसाठी पार्किंग व वाहतूकव्यवस्था चोख होती.
गुजराती समाजातर्फे मोदींचा सत्कार
पणजी दि. १५ (प्रतिनिधी) ः गुजरातचे "व्हायब्रंट' मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा आज पणजी गुजरात मंडळाने शाल, श्रीफळ, पगडी व तलवार देऊन सत्कार केला. टोंक पणजी येथील "ग्रीन एकर' येथे या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
डिचोली येथे आपली सभा गाजवून येथे दाखल झालेल्या मोदींचे गुजराती समाजाने जोरदार स्वागत केले. मोदी बोलण्यासाठी उभे राहिले असता पोलिसांनी आचारसंहितेमुळे ध्वनी प्रक्षेपण बंद केले. त्यामुळे त्यांनी त्वरित सर्व लोकांना आपल्या जवळ बोलावले आणि गुजरातमध्ये केलेल्या विकासाचा पाढाच वाचून दाखवला. एखाद्या घरातल्या व्यक्तीशी संवाद साधावा त्याप्रमाणे त्यांनी उपस्थित लोकांशी वार्तालाप केला. त्यांच्या या कृतीने उपस्थित लोक भारावून गेले. यावेळी विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांचाही गौरव करण्यात आला.
Thursday 16 April, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment