Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 18 July, 2009

लोकसभेतून भाजपचा सभात्याग

पाकिस्तानशी चर्चेच्या मुद्यावरून अडवाणींकडून पंतप्रधानांची कोंडी

नवी दिल्ली, दि. १७ - पाकिस्तानसोबतच्या वाटाघाटीचे भवितव्य त्यांच्या भविष्यातील भूमिकेवरच अवलंबून राहील. त्यांनी अतिरेक्यांवर कारवाई केली नाही तर समग्र चर्चेला अर्थच राहणार नाही, असे आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी लोकसभेतून विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली सभात्याग केला.
दहशतवादावर कारवाई केल्याशिवाय पाकसोबत चर्चा करणार नाही, अशी गर्जना करणाऱ्या डॉ. सिंग यांनी इजिप्तमध्ये गिलानीेंसोबत चर्चा कशी काय केली, असा मुद्दा उपस्थित करून भाजपने पंतप्रधानांना चांगलेच कोंडीत पकडले.
त्यावर खुद्द पंतप्रधानांनीच लोकसभेत उत्तर दिले. ते म्हणाले की, दहशतवादाविरुद्ध कारवाई करणे आणि वाटाघाटी करणे या बाबींची सांगड घातली जाऊ शकत नाही. त्यामुळेच आपण गिलानी यांची भेट घेतली. पण, भविष्यात भारत-पाक वाटाघाटी होणे हे पूर्णत: पाकिस्तान दहशतवादाविरोधात कोणती पावले उचलणार यावर अवलंबून राहणार आहे. पाकने अतिरेक्यांवर कठोर कारवाई करणे भारताला अपेक्षित असल्याचे आपण गिलानींना स्पष्ट केले आहे.
केवळ मुंबई अतिरेकी हल्ल्यातील आरोपींवर कारवाई करून भागणार नाही तर भविष्यात अशा प्रकारचे हल्ले करण्यासाठी पाकिस्तानी भूमीचा वापर अतिरेकी संघटनांकडून होता कामा नये, अशी कठोर कारवाई करावी, अशी सूचना आपण त्यांनी केली, असे पंतप्रधांनांनी निवेदनात स्पष्ट केले. मात्र, पंतप्रधानांच्या या उत्तराने भाजप नेते अडवाणी यांचे समाधान झाले नाही. भारत कोणाच्या तरी दबावाखाली असल्याचा आरोप करीत त्यांनी भाजप सदस्यांसह सभात्याग केला.
पंतप्रधान वचन विसरले

भारताचे पाकसोबत चर्चेला तयार होणे ही बाब देशासोबत विश्वासघात असल्याची तीव्र टीका भारतीय जनता पार्टीने केली आहे. भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, भारताचे हे पाऊल म्हणजे फार मोठा धक्का आहे. सरकारने देशासोबत केलेला हा विश्वासघात असून आपल्या भूमिकेपासून त्यांनी यू टर्न घेतला आहे. जोवर पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत राहील आणि मुंबईसह अन्य बॉम्बस्फोटाच्या घटनांमधील आरोपींवर कारवाई करणार नाही, तोवर त्यांच्याशी चर्चा केली जाणार नाही, अशी भूमिका भारताने घेतली होती. असे असूनही भारताने पाकसोबत चर्चेची तयारी दाखविणे ही बाब आक्षेपार्ह आहे. पाकिस्तानने आपल्या भूमीतून भारताविरुद्धच्या दहशतवादाच्या कारवाया थांबविण्याचे कोणतेही आश्वासन दिले नाही किंवा तसे संकेतही दिले नाहीत. शिवाय काश्मीर आणि भारत-पाक सीमेवर अतिरेकी कारवाया सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने पाकशी चर्चेचा निर्णय घेणे आपल्या धोरणांशी आणि देशाच्या अस्मितेशी केलेला दगाफटका आहे, असेही जावडेकर म्हणाले.
आज लोकसभेत विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी आणि उपनेत्या सुषमा स्वराज यांनीही हा मुद्दा उपस्थित केला. जर दहशतवादाला बाजूला ठेवले तर समग्र चर्चा कशी होईल? व्यापार आणि कैद्यांचे हस्तांतरण हे मुद्देही महत्त्वाचे आहेतच. पण, त्यावर चर्चा करताना दहशतवादाच्या मुद्याला बगल दिली जाऊ नये. आम्ही सरकारच्या या निर्णयाचा विरोध करतो, असेही त्या म्हणाल्या.
राज्यसभेतही अरुण जेटली यांनी हा मुद्दा उपस्थित करून सरकारच्या धोरणांवर टीका केली.

No comments: