Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 15 July, 2009

पावसाच्या प्रकोपाने मुंबई पुन्हा जलमय

मिठी नदी धोक्याच्या पातळीवर आजही अतिवृष्टीचा इशारा
मुंबई, दि. १४ : काल रात्रभर धो धो पाऊस पडल्याने आणि आज दिवसभरही अधूनमधून तो पडत राहिल्याने मुंबई महानगराच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन अस्ताव्यस्त झाले. विशेषत: मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे तिच्या काठावरील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हालवावे लागत आहे. असाच मुसळधार पाऊस उद्याही कोसळण्याचा अंदाज असल्याने नौदलाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
या पावसाने रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीवर परिणाम होऊन या धावत्या महानगराची गती आज एकदम मंदावली. सकाळी चाकरमाने वेळेवर पोहोचू न शकल्याने कार्यालयांमधील उपस्थिती रोडावली होती, तर दुपारनंतर घरी परतणाऱ्यांनी रेल्वे व बस स्थानकांवर एकच गडबड उडवून दिली.
चोहीकडे पाणीच पाणी
आज सकाळपर्यंत मूळ मुंबई असलेल्या दक्षिण व मध्य भागांत ४ इंच, पूर्व उपनगरांमध्ये ६ इंच, तर पश्चिम उपनगरांमध्ये ५ इंच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. काल सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळत होता आणि त्याने सकाळीच थोडी विश्रांती घेतली. तेव्हा ठिकठिकाणी साचलेले पाणी ओसरायला लागले होते. परंतु दुपारी पुन्हा पाऊस कोसळू लागला आणि मंद झालेली लोकल रेल्वे व बस वाहतूक शेवटी ३-४ तासांसाठी ठप्पच झाली. ती रात्री उशिरा पूर्वपदावर येऊ लागली आहे.
२६-२७ जुलै २००५ च्या जलप्रलयाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून पुरेशी तयारी केल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात काल रात्रीच्या व आज दुपारच्या पावसाने घाटकोपर, कुर्ला, शिव, माटुंगा, परळ, नायगाव, वडाळा, अंधेरी, वांद्रे या सखल भागांमध्ये नेहमीप्रमाणेच भरपूर पाणी साचले आणि त्याने त्या त्या भागांतील जनजीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले. रस्ते वाहतूक आणि लोकल गाड्यांची ये-जा या दोन्हींमध्ये अडथळे आल्याने लाखो प्रवाशांचे हाल झाले.
------------------------------------------------------------------
मेट्रोचा पूल कोसळला
मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे अनेक ठिकाणी पडझडही झाली. बेस्टच्या बसथांब्यांचे छप्पर, नामकरणाचे खांब ठिकठिकाणी वाकल्याचे आणि अनेक झाडे पडल्याचे दिसून येत होते. अंधेरी-कुर्ला मेट्रो रेल्वे लाइनसाठी बांधण्यात येत असलेल्या पुलाचा एक खांब रात्री कोसळून पुलाचे अर्धवट बांधकाम खाली आले. सुदैवाने त्यावेळी तेथे कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हे काम रिलायन्स या नामवंत कंपनीने घेतले आहे, हे येथे उल्लेखनीय आहे.

No comments: