पुत्र सुनील शास्त्री यांची मागणी
नवी दिल्ली, दि. ११ - माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या रहस्यमय मृत्यूसंदर्भातील माहिती देण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली असता ती देण्यास सरकारने नकार दिल्याने शास्त्री कुटुंबीयांनी आता अशी मागणी केली आहे की, लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूबाबत ज्या शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत त्यांचे निरसन केले जावे.
यासंदर्भात त्यांचे पुत्र सुनील शास्त्री म्हणतात, ""लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू हा आमच्या कुटुंबीयांसाठी तसेच देशासाठी एक मोठा धक्का होता. त्यावेळी आपण केवळ १६ वर्षांचे होतो. परंतु, तरीही मला चांगले आठवते की, शास्त्रीजींच्या छाती, पोट व पाठीवर गडद निळे डाग होते. शास्त्रींचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झाला आहे, अशी शंका मला व माझ्या आईला आली होती.'' सुनील शास्त्री पीटीआयशी बोलत होते. ""आमच्या कुटुंबीयांच्याच नाही तर लाखो देशवासीयांच्याही मनात शास्त्रीजींच्या मृत्यूबाबत शंका आहेत. लालबहादूर शास्त्री केवळ एक महान नेतेच नव्हते, तर देशाचा एक ठेवा होते. ते प्रेमळ होते. देशाचे ते एक सर्वोत्तम पंतप्रधान होते, असे अनेकांना वाटते. त्यामुळे सरकारने पुढे येत त्यांच्या रहस्यमय मृत्यूसंदर्भात जी काही माहिती आहे, ती उघड करून हा वाद एकदाचा समाप्त करावा.''
भारत-पाकिस्तान युद्धानंतर ११ जानेवारी १९६६ रोजी तेव्हाच्या सोव्हिएत युनियनमधील ताश्कंद येथे पाकिस्तानबरोबर करण्यात आलेल्या करारानंतर लालबहादूर शास्त्री यांचे निधन झाले होते. त्यांची पत्नी ललिता शास्त्री यांनी आरोप केला होता की, शास्त्रींना विष देण्यात आलेले आहे.
शास्त्रीजींच्या मृत्यूसंदर्भातील रहस्य सरकारने लपवून ठेवण्याचे काही एक कारण नाही, असे सांगून सुनील शास्त्री पुढे म्हणाले, मी जेथेही जातो, लोक मला लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूबाबत विचारणा करतात. सरकारने यासंदर्भातील माहिती देण्यासाठी मागेपुढे बघू नये. शास्त्रीजींच्या मृत्यूबाबत पंतप्रधान कार्यालयाला माहिती विचारली असता, कार्यालयाकडून असा खुलासा करण्यात आला की, अशी माहिती दिल्यास भारताच्या परराष्ट्र संबंधांना नुकसान पोहोचू शकते व संसदीय विशेषाधिकारांचे हे उल्लंघन आहे. अशी माहिती प्राप्त व्हावी यासाठी लेखक अनुज धर यांनी मागणी केली होती. लालबहादूर शास्त्री यांचे शवविच्छेदनही केले गेले नव्हते, हे सरकारनेही मान्य केले आहे. रशियन चिकित्सक तसेच पंतप्रधानांचे वैयक्तिक चिकित्सक यांनी त्यांच्या शवाची चिकित्सा केली होती. लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असे सांगण्यात आले. परंतु, त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूसंदर्भात शंका होती. पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, यासंदर्भात कागदपत्रे आहेत, पण ती देण्यास मनाई करण्यात आली आहे.
Sunday 12 July, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment