Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 15 July, 2009

विशेष दर्जाबाबत नोव्हेंबरमध्ये चर्चा

केंद्र राज्य संबंध आयोग परिषदेत नाममात्र उल्लेख
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): गोव्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री दिगंबर कामत व गृहमंत्री रवी नाईक यांनी आपल्या भाषणात पुसट असा उल्लेख केल्याची माहिती माजी गृह सचिव तथा केंद्र राज्य संबंध आयोगाचे सदस्य धीरेंद्रसिंग यांनी दिली. सध्याच्या परिस्थितीत सगळ्याच राज्यांकडून विविध कारणांवरून विशेष दर्जाची मागणी पुढे रेटली जात आहे. गोव्याला विशेष दर्जा देण्यासंदर्भात व्यापक चर्चा करण्यासाठी येत्या नोव्हेंबर महिन्यात आयोग पुन्हा एकदा गोव्याला भेट देणार आहे, असेही ते म्हणाले.
केंद्र राज्य संबंध आयोगातर्फे पश्चिम विभागीय सल्लागार परिषदेच्या समारोप सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना आयोगाचे सदस्य श्री. सिंग बोलत होते. यावेळी आयोगाचे इतर सदस्य विजय शंकर, व्ही. के. दुग्गल, एन. आर. माधव मेनन, मुकुल जोशी व सल्लागार शशी प्रकाश यावेळी हजर होते. गोव्यात मोठ्या प्रमाणात खनिज उत्खनन होते तसेच येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही एकूण लोकसंख्येच्या दुप्पट असल्याने या राज्याला विशेष दर्जा मिळावा, असा उल्लेख मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी केला. मुळात सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक राज्य विशेष दर्जाची मागणी करीत आहे. ही मागणी नकारात्मक व सकारात्मक अशा दोन्ही दृष्टिकोनातून होते, असेही श्री. सिंग म्हणाले. सध्याच्या दोन दिवसीय परिषदेत पश्चिम विभागातील इतरही राज्यांचे प्रतिनिधी होते व त्यांनीही आपली मते आयोगासमोर ठेवली. दरम्यान, काही विशेष मुद्यांवर पुन्हा एकदा सखोल चर्चा करण्याचा विचार आयोगाने केला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा आयोग येथे येणार आहे व त्यावेळी अशा काही महत्त्वाच्या विषयांवर विविध तज्ज्ञांची मते जाणून घेतली जाणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

No comments: