Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 14 July, 2009

धावे व ब्रह्मकरमळीचे रहिवासी खाणीविरोधात ग्रामदेवतेकडे

वाळपई, दि. १३ (प्रतिनिधी)- ""हे देवा, ब्रह्मदेवा, सृष्टीच्या रक्षणकर्त्या, तू ब्रह्मकरमळी व नगरगाव पंचायत क्षेत्रातल्या निसर्गरम्य वातावरणात उभा आहेस. काही षड्यंत्री पाताळयंत्री माणसे पुढे सरसावली आहेत, त्याचबरोबर या नियोजित खाणीमुळे हे ब्रह्मदेवा, जनतेबरोबर खऱ्या अर्थाने तुझे अस्तित्व सुद्धा धोक्यात आहे. आजपर्यंत आम्ही तुझ्या अस्तित्वावरच जगत आलो आहोत. म्हणून हे ब्रह्मदेवा ही होणारी नियोजित खाण आम्हाला नको आहे. म्हणून तू आमचे रक्षण कर व या खाणीला हद्दपार कर''.
धावे व ब्रह्मकरमळी या गावात होणाऱ्या नियोजित खाणींमुळे सध्या संपूर्ण सत्तरी तालुक्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सदर नियोजित खाण कधीही न होण्यासाठी ब्रह्मकरमळी येथील ग्रामस्थांनी सुप्रसिद्ध ग्रामदैवत श्री ब्रह्मदेवाला सार्वजनिक गाऱ्हाणे घातले. गावचे पुरोहित संदीप केळकर यांनी हे गाऱ्हाणे घातले. याप्रसंगी ऍड. शिवाजी देसाई, अप्पासाहेब देसाई, मिलिंद गाडगीळ, यशवंत सावंत, नारायण सावंत, स्वातंत्र्यसैनिक गणेश हरवळकर, दीपक धुरी, वामनराव देसाई, दत्ता पिंगुळकर, स्वप्नज, पराग खाडीलकर, दिनकर देसाई, गोविंद च्यारी, जयसिंग देसाई, सगुण म्हावळंगकर, गजानन म्हावळंगकर, विठ्ठल दळवी, आनंद नाईक, आनंद कुंभार, समीर शेळपकर, राजाराम गावडे, हरिश्चंद्र गावकर, विलास गावस, विनोद नाईक, संदीप गुरव, मयूर माशेलकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या धावे ब्रह्मकरमळी येथे होणाऱ्या नियोजित खाणीसंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने येत्या ११ ऑगस्ट रोजी धावे येथे सार्वजनिक सुनावणी ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर सदर खाणीला पंचायत क्षेत्रातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. नवसाला पावणारा देव अशी ब्रह्मदेव देवस्थानची ख्याती आहे, अनेक वेळा ते सिद्धही झाले आहे. १९९८ साली सुद्धा खाणीच्या विरोधात ब्रह्मदेवाला सार्वजनिक गाऱ्हाणे घातले होते व खाण बंद पाडली होती. यामुळे ब्रह्मदेवाच्या अस्तित्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे संदीप केळकर यांनी सांगितले. हे देवस्थान निसर्गरम्य परिसरात आहे. या परिसराला खाणीच्या माध्यमातून जर कोणी नेस्तनाबूद करत असेल तर त्याला ब्रह्मदेवाच्या कोपाचा बळी ठरावा लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
गोव्यातील खाण व्यावसायिकांना सर्वोच्च न्यायालयाने वारंवार दिशानिर्देश देऊनसुद्धा याचे तंतोतंत पालन आज गोव्यात केले जात नाही. अशा खाण मालकांनी आपला मोर्चा आता धावे व ब्रह्मकरमळी गावाकडे वळवला आहे. धावे गाव उंचवट्यावर असल्याने सत्तरीची जीवनदायिनी नदी म्हादई मार्गक्रमण करत आहे, या नदीचे अस्तित्वच खाणीमुळे धोक्यात येणार आहे, असा इशारा खाणीचा विरोध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यसैनिक गणेश हरवळकर, संदीप केळकर, आप्पासाहेब देसाई उपस्थित होते.
यावेळी बोलताना ऍड. देसाई म्हणाले की, सदर खाणीमुळे म्हादईचे जलस्रोत कमी होणार आहेच शिवाय नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषितही होणार आहे. दाबोस येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाण्याची कमतरता जाणवणार कारण ब्रह्मकरमळी सर्व्हे क्र. २१ व ६४ या ठिकाणी नियोजित खाण होत आहे आणि याच ठिकाणी म्हादईचे जलस्रोत आहेत. याशिवाय धावे गाव करमळीला लागूनच असल्याने तेथील अभयारण्यही धोक्यात येणार आहे. अभयारण्य क्षेत्रात खाणींना परवाना मिळतो मात्र शेतकऱ्यांना शेती करण्यास विरोध होतो. सरकारची ही भूमिका दुटप्पी असल्याची टीका त्यांनी शेवटी केली. खाणीमुळे जलसंपदा नष्ट होऊन पूर येण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली.
संदीप केळकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

No comments: