Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 13 July, 2009

दिल्लीतील मेट्रो पूल कोसळून पाच ठार

प्रकल्प प्रमुख ई.श्रीधरन यांचा राजीनामा

नवी दिल्ली, दि. १२ - दक्षिण दिल्लीत केंद्रीय सचिवालय ते बदरपूर मार्गावर जमरदपूर येथे लेडी श्रीराम कॉलेजजवळ मेट्रो रेल्वेचा अर्धवट बांधकामाच्या स्थितीतील पूल कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातात एका अभियंत्यासह पाच कामगार ठार झाले तर अन्य १५ जण जखमी आहेत. गेल्या आठ महिन्यात मेट्रोे रेल्वेच्या बांधकामातील हा दुसरा मोठा अपघात असून याची नैतिक जबाबदारी स्वीकारीत प्रकल्पाचे प्रमुख ई. श्रीधरन यांनी राजीनामा दिला आहे.
ही घटना आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. जखमींना एम्स, सफदरजंग आणि मूलचंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत्यू झालेले तसेच सगळे जखमी मजूर गेमन इंडिया कंपनीसाठी काम करीत होते. मृतांमध्ये मजुरांसह गेमन इंडियाच्या अभियंत्याचाही समावेश आहे. या २८ वर्षीय अभियंत्याचे नाव अंशुमन असल्याचे समजते.
तुटलेल्या पुलाचा एक भाग जवळच असलेल्या जलवाहिनीवर पडून ती फुटल्यामुळे संपूर्ण परिसरात पाणी साचून तळे झाले. त्यामुळे पुलाचा कोसळलेला भाग दूर करण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. जमरदपूर येथील रस्ते वाहतूक कोलमडली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस आटोकाट प्रयत्न करीत आहेत. मेट्रो रेल्वे प्रशासनाने अपघाताबाबतची माहिती देण्यासाठी हेल्पलाईनही सुरू केली आहे. अपघाताची चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही मेट्रो रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
घटनेच्या वेळी पुलाच्या ठिकाणी सुमारे ३० मजूर काम करीत होते. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे पाच वाजताच्या सुमारास प्रचंड मोठा आवाज झाला. बॉम्बस्फोट किंवा भूकंप झाला असावा, इतका तो प्रचंड आवाज होता. आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता पुलाचा एक मोठा खांब कोसळलेला दिसला. या अपघाताच्या काही दिवस आधीच या पुलाच्या मोठ्या खांबाला प्रचंड मोठ्या दोन भेगा पडल्याचे लक्षात आले होते. त्याविषयी प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांनी तक्रारही केली होती. पण, सजग नागरिकांच्या या तक्रारीची प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने हा मोठा अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
"काही गाड्या खरंच महागड्या असतात'
ही प्रतिक्रिया आहे दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे प्रमुख ई. श्रीधनरन यांची. दिल्लीतील अपघाताची जबाबदारी स्वीकारून आज श्रीधरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते दिल्ली रेल्वे मेेेट्रो प्रकल्पाचे प्रमुख होते. घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ दिल्ली गाठले. एक पत्रपरिषद घेऊन त्यांनी आपला राजीनामा जाहीर केला. ते म्हणाले की, काही गाड्या खरंच महागड्या असतात. त्या चालविण्यासाठी किती किंमत मोजावी लागते, याचा अंदाज आपल्याला येऊ शकत नाही. मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या मार्गाच्या बांधकामातील हा दुसरा अपघात आहे. यापूर्वी १९ ऑक्टोबर रोजी पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगरच्या विकास मार्गावर असलेला पूल कोसळला होता. या अपघातात पुलाखालून जाणारी बस सापडून दोन प्रवासी ठार झाले होते.
दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी आज एम्सला जाऊन या अपघातातील जखमींची विचारपूस केली. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जारी केले. राज्य शासनातर्फे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये तर जखमींना दोन लाख रुपये दिले जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. केंद्रा सरकारनेही या प्रकारात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.

No comments: