Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 14 July, 2009

गोव्याने खंबीर भूमिका घेतल्यास म्हादईचा बचाव

बेळगाव, दि. १३ (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने म्हादईप्रश्न सोडवण्यासाठी लवाद नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याने कर्नाटकने सुरू केलेले कळसा कालव्याचे काम स्थगित ठेवले जाण्याची चिन्हे दिसत आहेत. तशातच आता जोरदार पाऊस पडू लागल्याने सध्या हे काम बंद करण्यात आले आहे. लवादाचा निर्णय येईपर्यंत हे काम सुरू करणे कर्नाटक सरकारला शक्य होणार नाही. असे असले तरी लवादामुळे कोणताही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया पाटबंधारे मंत्री बसवराज बोम्माई यांनी व्यक्त केली आहे. म्हादई वाचविण्यासाठी गोवा सरकार किती गांभीर्याने भूमिका घेते, याकडेच साऱ्यांचे लक्ष आहे.
कर्नाटक व गोवा राज्यांमध्ये म्हादईचे पाणी वळविण्यावरून तंटा निर्माण झाल्याने अखेर गोवा सरकारच्या विनंतीवरून केंद्राने लवाद नेमण्याचे ठरविले आहे. कळसा व भंडुरा नद्यांचे पाणी अडवून ते पाणी मलप्रभा नदीत वळविण्याची कर्नाटक सरकारची योजना आहे. सध्या कणकुंबीपासून कळसा नदीपर्यंत कालव्याचे काम त्या सरकारने हाती घेतले आहे. माऊली मंदिरापासून एक किलोमीटर कालवा खणण्यात आला आहे. त्यामुळे मंदिरालाही धोका निर्माण झाला आहे. याबाबत स्थानिकांनी आवाज उठविताच कंत्राटदारांकडून धमकी देण्याचे सत्र सुरू झाले आहे. गोवा सरकारने या बाबतीत आपल्या पाठीशी राहावे, अशी तेथील जनतेची इच्छा आहे. पावसाळा संपल्यावर पुन्हा काम सुरू करण्यात येईल, असे बोम्मई यांनी म्हटल्याने गोवा सरकारने अधिक जागरूकपणे आपली बाजू भक्कमपणे लवादासमोर मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments: