Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 16 July, 2009

गोव्यात रेड अलर्ट

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) ः मुंबईवर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा आराखडा दहशतवादी संघटनांनी आखला असून त्यासाठी लागणारी रसद पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यातून उतरवली जाणार असल्याची माहिती मिळाल्याने गोव्यात "रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. याविषयीची नवा आदेश देशाचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी जाहीर केला असून गोवा पोलिस सुरक्षा विभागाचे पोलिस अधीक्षक व्ही. व्ही. चौधरी यांनी याला दुजोरा दिला आहे.
केंद्रीय गुप्तचर विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून पुन्हा पुन्हा दक्षतेचे संदेश येत असल्याने आता या सूचनेकडे गांभीर्याने पाहिले जात असल्याची माहिती अधीक्षक चौधरी यांनी दिली आहे. गोव्याच्या किनारपट्टी क्षेत्रात सुरक्षा वाढवण्यात आली असून खवळलेल्या स्थितीत असलेल्या समुद्री मार्गावर करडी नजर ठेवण्यासाठी तटरक्षक दल आणि नौदलाची विशेष मदत घेण्यात आली आहे. या दोन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली असून सर्व सीमेवर मोठी जहाजे उभी करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
किनारपट्टी क्षेत्रात राहणाऱ्या ग्रामस्थांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत असून त्यांनाही सतर्क राहण्यास सांगितले आहे. कोणतेही अनोळखी जहाज, बोट तसेच व्यक्ती उतरल्याचे निदर्शनास आल्यास त्याची त्वरित माहिती पोलिसांना देण्याची सूचना मच्छीमारांना तसेच अन्य नागरिकांना देण्यात आली आहे. किनारपट्टी क्षेत्रातील पोलिस स्थानकांना सतर्क राहण्याचे संदेश पाठवण्यात आले आहेत. ८ जुलै रोजी गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांना केंद्राकडून सामान्य "अलर्ट' देण्यात आला होता. परंतु, त्यानंतर जम्मू काश्मीरमधील एका कारवाईत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांकडून मुंबईतील विविध स्थळांचे फोटो तसेच अन्य माहिती असलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी गोवा पोलिस सज्ज होत आहेत. खात्याला गेल्या काही दिवसापूर्वी केंद्रातून अद्ययावत बंदुका आणि अन्य हत्यारे उपलब्ध झालेली आहेत. "रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर कोणत्याही ठिकाणी जाऊन कारवाई करण्यासाठी जलदगती पोलिस पथकामध्ये तात्पुरती वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी उत्तर व दक्षिण गोव्यात केवळ दोनच पथके कार्यरत होती. त्याचप्रमाणे, निमलष्करी दलाच्या तुकड्या मागवण्याचाही विचार असून त्यासाठी केंद्राशी बोलणी सुरू असल्याचे अधीक्षक चौधरी यांनी सांगितले.
येणाऱ्या काळात वास्कोतील प्रसिद्ध श्री देव दामोदर भजनी सप्ताह तसेच स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात कडक सुरक्षा ठेवण्यात येणार असल्याने अतिरिक्त पोलिस दलाच्या तुकड्या बोलावल्या जाणार आहेत.

No comments: