Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 12 July, 2009

गीतकार शांताराम नांदगावकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

मुंबई, दि. ११ - "रुपेरी वनात', "दाटून कंठ येतो', "ससा तो कसा' यांसारखी एकाहून एक कसदार गीते लिहून रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेले ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. खारदांडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा अनेकांना हुंदका आवरणे कठीण बनले होते. त्यांच्या गीतांनी केवळ जुन्याजाणत्यांनाच नव्हे तर युवावर्गालाही विलक्षण मोहिनी घातली होती. आजही त्यांच्या गीतांचे माधुर्य कमी झालेले नाही.
अनेक दिवसांपासून त्यांना मधुमेह, आणि अल्झायमरचा त्रास होत होता. उपचारासाठी ते बरेच दिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होते. तिथेच शनिवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि सून असा परिवार आहे.
ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर हे मुळचे कणकवलीच्या नांदगावाचे निवासी. लहानपणीच ते मुंबईत आले. दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. अत्यंत लाघवी स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार होता. ते १९८५ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विधानपरिषदेवर निवडून गेले होते.
नांदगावकर यांनी लिहिलेली प्रसिद्ध गीते
ह्रदयी वसंत फुलताना (अशी ही बनवाबनवी), रुपेरी वाळूत माडाच्या बनात, दाटून कंठ येतो (अष्टविनायक), ससा तो कसा.. (बालगीत), प्रथम तुला वंदितो (अष्टविनायक), पाहिले ना मी तुला (गुपचुप), धुंदीत गंधीत होऊनी सजणा, दर्यावरी रे आणि सजल नयन नीतधारा बरसती ही भैरवी.

No comments: