"कदंब'चे कर्मचारी खवळले
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) - येत्या २१ दिवसांच्या आत आम्हा कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करा, अन्यथा काम बंद ठेवू, असा खणखणीत इशारा आज येथे कदंब वाहतूक कर्मचारी संघटनेच्या मेळाव्यात देण्यात आला.
मात्र या इशाऱ्याचा सरकारवर परिणाम झाला नाही. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला आलाच नाही. सरकारने नियुक्त केलेली समिती याबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे सांगून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या प्रकरणाची बोळवण केली.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होणाऱ्या सर्व सुविधा कदंब महामंडळालाही लागू होतात असा नियम आहे. मात्र राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केलेला नाही. त्यामुळे कदंबच्या खवळलेल्या कामगारांनी सध्या आंदोलन चालवले आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत नाईक यांनी हा आयोग लागू करण्याचे लेखी आश्वासन ६ मार्च २००९ रोजी कामगार संघटनेला दिले होते. या अनुषंगाने मुख्यमंत्री, वाहतूकमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती संघटनेला केली होती. श्री.नाईक यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेतलेल्या कामगारांची सरकारने जणू फजितीच मांडल्याचा आरोप कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केला.कामगार आयुक्तांसोबत या मुद्यावर अनेक बैठका झाल्या; परंतु महामंडळ व्यवस्थापनाकडून चालढकल केली जात असल्याने आता कर्मचाऱ्यांचा पारा चढल्याचेही ते म्हणाले.
महामंडळाचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी २०० अतिरिक्त बसगाड्यांची गरज आहे व त्यासाठी सरकारेन तात्काळ निधीची व्यवस्था करावी,अशी मागणीही यावेळी करण्यात आली. विविध ठिकाणी महामंडळाच्या डेपोंचे आधुनिकीकरण करण्याच्या गरजेवरही फोन्सेका यांनी जोर दिला.या मेळाव्याला सुमारे पाचशे कर्मचारी उपस्थित होते..कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्योकिम फर्नांडिस, गजानन नाईक आदी नेतेही यावेळी हजर होते.
रेजिनाल्ड यांच्या वक्तव्यास हरकत
कदंब महामंडळाच्या दारुण परिस्थितीला कामगार जबाबदार असल्याचा आरोप कदंब महामंडळ उपाध्यक्ष तथा आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याला फोन्सेका यांनी तीव्र हरकत घेतली. मुळात कदंब कर्मचाऱ्यांनी घाम गाळून व काबाडकष्ट करून हे महामंडळ टिकवून ठेवले आहे. रेजिनाल्ड यांना खरोखरच महामंडळाचा कारभार सुधारायचा असेल तर त्यांना कामगारांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल,असे आश्वासनही फोन्सेका यांनी दिले.महामंडळाच्या ढासळत्या स्थितीला झारीतील शुक्राचार्य जबाबदार आहेत हे रेजिनाल्ड यांनी लक्षात घ्यावे. त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. उगाच कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवून हात झटकू नये, असे आवाहन त्यांनी रेजिनाल्ड यांना केले.
Thursday 16 July, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment