Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 25 January, 2011

खारीवाड्यातील ३६० घरांवर कोणत्याही क्षणी कारवाई

वास्को, दि. २४ (प्रतिनिधी): खारीवाडा किनार्‍याजवळच्या ३६० घरांवर बुलडोझर फिरवून १५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयासमोर अहवाल सादर करण्यासाठी पालिका यंत्रणा कामाला लागली आहे. यासंदर्भात पुढची पावले उचलण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी पालिका मुख्याधिकार्‍यांना उद्या (मंगळवारी) सर्व कागदपत्रांसह आपल्या दालनात पाचारण केल्याने ३६० कुटुंबीयांवर कोणत्याही क्षणी संकट कोसळण्याची शक्यता बळावली आहे.
खारीवाडा किनार्‍यावर असलेल्या ३६० घरांना ‘एमपीटी’ (मुरगाव पोर्ट ट्रस्ट) च्या विस्तारीकरणासाठी तसेच इतर काही कारणांसाठी हटवण्याकरिता सुमारे दोन वर्षांपूर्वी ताब्यात घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर खास याचिका दाखल करण्यात आली होती. सदर भागातील ३६० बांधकाम जमीनदोस्त करून संपूर्ण अहवाल न्यायालयासमोर ठेवण्याचा आदेश यापूर्वी देण्यात आला होता. ही माहिती पालिका सूत्रांनी दिली. यावेळी संबंधित बांधकामांपैकी ३० बांधकाम मालकांनी प्रशासकीय लवादासमोर जाऊन सदर आदेशावर स्थगिती आणण्यात यश मिळवले होते. सदर आदेशानंतर मुरगाव नगरपालिकेने इतर बांधकामावरही कारवाई न केल्याने न्यायालयाने, उर्वरित बांधकामांवर कशा स्वरूपाची कारवाई केली, असा सवाल उपस्थित केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सदर प्रकारणी मुरगाव पालिका मंदगतीने कारवाई करत असल्याचे नजरेला पडताच त्याची दखल घेत न्यायालयाने नुकत्याच झालेल्यासुनावणीदरम्यान दखल घेतली. येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत खारीवाडा येथील सदर ३६० घरांवर कारवाई करून त्याबाबतचा संपूर्ण अहवाल सादर करण्यास सांगितल्याने पालिकेपुढे पेच निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
याबाबत अधिक माहितीसाठी काही पत्रकारांनी मुरगाव नगराध्यक्ष सौ. सुचेता शिरोडकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे लागेल, एवढेच त्यांनी स्पष्ट केले.
न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका कारवाई करणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, बांधकाम कृती दल व अन्य यंत्रणांना पालिकेने (मुख्याधिकारी) पत्र लिहून सुरक्षा मागितल्याचे सांगण्यात आले. न्यायालयाच्या आदेशाबाबत पावले उचलण्यासाठी
मुख्य सचिव संजीव श्रीवास्तव यांनी सदर प्रकारावर चर्चा करण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी गोपाळ पार्सेकर यांना उद्या (मंगळवारी) आपल्या कार्यालयात याबाबतची सर्व कागदपत्रे घेऊन बोलवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान खारीवाडा येथील ३६० घरावर कारवाई करण्याचा निर्णय पक्का झाल्यास तेथील वातावरण तंग होण्याची शक्यता दिसत आहे.
१३ फेब्रुवारी रोजी मुख्याधिकार्‍यांनी मागितलेली सुट्टीही रद्द करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजले.

No comments: