Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 12 August, 2010

इतिहास समजून न घेणारा जेम्स

लेखमाला २०

पृष्ठ क्रमांक ५२ वर खालच्या परिच्छेदात जेम्स लेन, शिवाजी महाराज आणि त्यांचे तंजावरचे सावत्र बंधू श्री व्यंकोजी महाराज या दोघांनीही समर्थ रामदासांना काही सनदा दान दिल्याचे लिहितोे - It apears likely that Ramdas may have sought and received the patronage of both kings, and given that the two brothers were rivals and followed very different agendas, it is even more doubtful that Ramdas played a major role in Shivaji`s life. (पृ ५२)
व्यंकोजी राजे तंजावरला होते. समर्थांचा मठ त्याचवेळी तंजावरला होता. सज्जनगडावरील श्रीरामाच्या मूर्ती तंजावरच्या कारागिराने तयार केल्या होत्या. समर्थांचे तेथे जाणे येणे होत असे. त्यामुळे या दोन्ही भावांचा संबंध समर्थांशी होता अशी शक्यता तो वर्तवतो. पण त्या दोघांमधील संबध एकमेकांच्या विरोधी होते. दोघांमध्ये चुरस होती (rivals) हे मात्र धांदात चुकीचे आहे. राज्याभिषेक होईपर्यंत महाराजांना दक्षिणेकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे तोपर्यंत त्या दोन्ही भावांचे संबंध बिघडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्यात चुरस कसली असेल? महाराज मार्च १६७७ च्या सुमारास जिंनी तंजावर भागात पोहचले. तेव्हा दोघांमध्ये वितुष्ट आले. सहा महिन्यांतच दोघांमध्ये सख्यही झाले. शिवसमर्थ संबंध त्या पूर्वीपासूनचे होते. त्यामुळे लेनचे विधान वस्तुस्थितीला धरून नाही. या उलट संभाजीराजे मोगलांना मिळून नंतर परत आले, त्यावेळी महाराजांनी त्यांना सज्जनगडावर समर्थांच्या सहवासात राहण्यासाठी पाठविले होते हे लक्षात घेण्यासारखे आहे. समर्थांच्या सहवासाने संभाजी महाराजांच्या मनातील काहूर शमेल हा विश्वास महाराजांना वाटणे यातच त्या दोघांमधील जीवाभावाच्या संबंधाचे दर्शन घडते.
महीपतिंचे संत साहित्य व इतिहास मिमांसा-
लेनने पृ. ५३ ते ५८ पाने महीपति यांनी लिहिलेल्या शिवसमर्थ चारित्र्यावर खर्ची घातली आहेत. ते लिहिताना महीपतिंनी जणू इतिहास लिहिला आणि तो चुकीचा आहे असे त्याचे प्रतिपादन आहे.
ज्याला मराठ्यांची इतिहास मिमांसा करायची आहे, त्याने "जसे रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकातील पात्रांवरून अथवा श्रीमान योगी या कादंबरीतील वर्णनावरून निष्कर्ष काढायला नकोत. तसेच महीपतिंच्या साहित्यावरूनही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. खरेतर महीपतिंचे संत साहित्य हा या पुस्तकाचा विषयच होऊ शकत नाही. महीपतिंच्या साहित्यात संतांच्या गोष्टी आहेत. त्या साहित्याविषयी मराठीतून अभ्यासकांनी काय लिहिले आहे हे पाहणे हे उद्बोधक ठरेल. मराठी विश्वचरित्र कोशातील नोंदीत महीपतींच्या साहित्याविषयी लिहिले आहेः "त्यांची लेखन' शैली रसाळ व प्रसादिक असून चरित्रनायकाच्या रम्याद्भूत कहाण्या त्यांनी प्रकर्षाने दिल्या आहेत. त्यामुळे त्यात चिकित्सा व ऐतिहासिक वास्तवता त्यांना अपेक्षित नसावी. असे असूनही चरित्रे भक्त मनोभावे वाचतात. (भारतीय चरित्र कोश खंड ३ पृ ६९६ संपादक श्रीराम पां. कामत, पर्वरी गोवा इ. स. २००५)
त्यापूर्वी संकलीत केल्या गेलेल्या भारतीय संस्कृती कोशातही असेच मत नोंदविले गेले आहे. "विभूतीपूजक वृत्तीनेच सर्व संतांचे महात्म्य सारख्याच भक्तीभावाने ते वर्णितात. चमत्कारांचे भाकड सांगून त्या त्या व्यक्तीभोवती दैवी वलय त्यांनी निर्माण केले आहे. स्थलकाल परिस्थिती वगैरेच्या माहितीबाबतचा बारकावा महानुभावांच्या चरित्रगं्रथाप्रमाणे महीपतिंच्या ग्रंथात सापडत नाही' (भारतीय संस्कृती कोश खं. ७ पृ २६० संपादक पं. महादेवशास्त्री जोशी इ. स. १९७२)
महीपतिंच्या साहित्याबाबत लेन लिहतो. The stories are vaguely situated formulaic, and clearly written for ideological purpose other than those of preserving an accurale portroyal of Shivaji (पृ 53) इतके लिहून त्याने तो विषय सोडून दिला असता तर योग्य होते. कोणत्याही आधुनिक इतिहासकाराने महीपतिबुवांच्या कथा इतिहासाची साधने म्हणून विचारात घेतल्या नाहीत. त्यात अतिशयोक्ती आहेच.
ही अतिशयोक्ती अमेरिकेत आणि पाश्चात्य राष्ट्रातही होते. आपण जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या गोष्टीची नोंद पूर्वी घेतलीच आहे. तशीच अतिशयोक्ती दुसरी महान व्यक्ती थॉमस जेफर्सन यांच्या संदर्भात ही केली गेली. थॉमस जेफर्सनहा समलैंगिक होता. तसेच स्वतः जरी स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असला तरी त्याच्या मालकीचे दिड-दोनशे गुलाम होते. त्याने जी अमेरिकेची घटना लिहली ती स्थानिक आदिवासी जमातींच्या इरोकींच्या (Iroguois) सहा राज्यांच्या एकत्रित घटनेवर आधारलेली. त्याचा संदर्भ टाळला जातो. थॉमस जेफर्सनच्या विद्वत्तेबाबत शंकाच नाही. त्याला अनेक विषयात गती होती. त्याच्या जणू सर्वज्ञ असण्याचे पुरावे देणाऱ्या घटना अमेरिकेत प्रसृत आहेत. त्यात अतिशयोक्ती असते. तोच प्रकार त्याच्या पूर्वी शंभर वर्षे होऊन गेलेल्या शिवाजी महाराजांच्या बाबतीत महीपतिंच्या वाङ्मयात घडले एवढेच म्हणता येईल.

No comments: