तब्बल ४० रु. किलो
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): कडधान्ये, भाज्या व कांदे, बटाटे यांच्या वाढलेल्या किमतीमुळे सध्या सर्वसामान्य जनता जेरीस आलेली असतानाच आता साखरेचेही दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गरीब जनतेवर मधुमेही रुग्णासारखी बिनसाखरेचा चहा घेण्याची पाळी आली आहे.
राजधानी पणजी शहरातील विविध भुसारी दुकानावर सध्या साखर प्रति किलो ४० रुपये या भावाने विकली जात आहे. मात्र गोवा बागायतदार संस्थेच्या विविध केंद्रांवर साखर पस्तीस ते साडे पस्तीस रुपये किलो या दराने विकली जात आहे. गोवा बागायतदार संस्था व खाजगी दुकानामधून विकल्या जाणाऱ्या साखरेच्या दरात प्रचंड तफावत जाणवत असून खाजगी दुकानवाले दामदुप्पट दर आकारत असल्याचे दिसून येत आहे. तूरडाळीच्या गगनाला भिडलेल्या दराने शतक ओलांडले होते, ते दर मध्यंतरी कमी झाल्याचे सांगितले जात होते, आता बाजारात तूरडाळीचे दर पुन्हा १०० ते ११० रुपये सांगितले जात आहेत. चणादाळीनेही नव्वदी ओलांडली असून, या डाळीचे खुल्या बाजारातील दर ९५ च्या वर गेले आहेत. गोवा बागायतदार संघाच्या विक्री केंद्रांत ते ८३ ते ९२ रु. असे आहेत. गुळानेही मागेच चाळीशी गाठली आहे. या वाढत्या महागाईवर "दर नियंत्रण विभाग' असलेल्या नागरी पुरवठा खात्याचे काहीच नियंत्रण नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. या दरांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी मात्र सर्वसामान्य जनता कृत्रिम महागाईच्या ओझ्याखाली दबून जात असताना मूग गिळून गप्प आहेत हे धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया सामान्य माणूस व्यक्त करीत आहे. ज्या नियमित वेतन मिळते, महागाई भत्ता मिळतो, वेतन आयोगानुसार पगार मिळतो, त्यांचा अपवाद वगळल्यास अन्य हजारो कुटुंबे या महागाईने संकटात सापडली आहेत. सरकारी पातळीवर मात्र याची कोणतीच दखल घेतली जात नाही. "कॉंग्रेसचा हात गरिबांच्या साथ' असा नारा देणाऱ्या संपुआ सरकारच्या राजवटीत सतत महागाई वाढत चालली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आणखी दोनतीन महिने कळ सोसा, असा साळसूद सल्ला दिला आहे! गेली अनेक वर्ष ते पद सांभाळताना जे त्यांना जमले नाही, ते तीन महिन्यानंतर अशी कोणती जादूची कांडी फिरविणार आहेत, याबद्दल जनतेमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
Wednesday 11 November, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment