Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 12 November, 2009

कुर्टी वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने समस्या

..दक्षिण गोव्यावर परिणाम
..सोमवारपासून सुरळीत पुरवठा

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): राज्यात काल पावसामुळे झालेल्या विजेच्या गडगडाटामुळे कुर्टी उपवीज केंद्रात मोठा बिघाड झाला आहे. या घटनेमुळे येथील शंभर मेगावॉटचा एक ट्रान्स्फॉर्मर बिघडल्याने त्याचे परिणाम दक्षिण गोव्यातील औद्योगिक वसाहतींवर झाला आहे. येत्या सोमवारपर्यंत ही परिस्थिती पूर्ववत होईल,अशी माहिती वीजमंत्री आलेक्स सिकेरा यांनी दिली.
आज पर्वरी मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी वीज खात्याचे मुख्य अभियंता निर्मल ब्रागांझा उपस्थित होते.कर्नाटक व महाराष्ट्रातून होणारा वीज पुरवठा कुर्टी उपविज केंद्राव्दारे घेतला जातो व इथून तो राज्यातील विविध भागांत सोडण्यात येतो. सुमारे ३०० मेगावॉट विजेच्या या उपकेंद्रात एकूण तीन ट्रान्स्फॉर्मर्स आहेत. त्यात एक बदलण्यासाठी पाठवण्यात असून दुसऱ्यात हा बिघाड तयार झाला आहे.सध्या केवळ एकच ट्रान्स्फॉर्मर इथे कार्यन्वित आहे. या उपविज केंद्रात झालेल्या बिघाडामुळे दक्षिण गोव्यातील बहुतेक औद्योगिक वसाहतीमध्ये मर्यादित वीज पुरवठा सुरू आहे. प्रत्यक्ष या घटनेचा सामान्य लोकांना होणाऱ्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला नाही पण औद्योगिक वसाहतीमधील पुरवठ्यावर परिणाम जाणवला आहे. अशा प्रकारची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचेही यावेळी श्री.सिकेरा म्हणाले. पॉवर ग्रीडच्या मदतीने ही स्थिती पूर्ववत करण्यात येणार आहे. मुळात कुर्टी येथील हे ट्रान्स्फार्मर फार जुने असल्याने ते बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याची वीज क्षमता सध्या ४०० मेगावॉट आहे व केवळ रात्रीच्या वेळी राज्याला विजेची कमतरता भासते.दिवसा अतिरिक्त वीज असते.२०१२ पर्यंत राज्याला ७२१ मेगावॉट विजेची गरज भासणार आहे,अशी माहितीही यावेळी श्री.सिकेरा यांनी दिली.

No comments: