Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 13 November, 2009

चार नौका अद्याप बेपत्ता ५९ खलाशांचा शोध जारी

...२९ नौकांचा शोध लागला
...किनारा रक्षक दल व नौदलाची कामगिरी

वास्को, दि. १२ (प्रतिनिधी): 'फयान' चक्रीवादळामुळे गोव्यातील बेपत्ता झालेल्या ३३ मच्छीमार नौकांपैकी आत्तापर्यंत २९ नौकांचा शोध लावण्यात आलेला आहे. २४ तासांपूर्वी झालेल्या तुफानामध्ये आत्तापर्यंत मच्छीमार नौकांवरील ५९ खलाशी पाण्यामध्ये बेपत्ता असून त्यामध्ये आज संध्याकाळी वाचविलेल्यांचा अपवाद वगळता "जीवन'वरील अन्य २३ जणांचा समावेश आहे. त्या सर्वांचा शोध चालू असल्याची माहिती गोवा किनारा रक्षक दलाचे प्रमुख एम.एस. डांगी यांनी आज संध्याकाळी दिली.
आज संध्याकाळी गोवा तटरक्षक दलाच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी श्री. डांगी यांनी माहिती देताना सांगितले की २४ तासांपूर्वी झालेल्या "फयान' चक्रीवादळामुळे गोव्यातील किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात नुकसानी सोसावी लागली. ११ नोंव्हेबर रोजी गोव्यातील वेगवेगळ्या भागांमधील ३३ मच्छीमार नौका खोल समुद्रात भरकटल्याची माहिती मिळताच किनारा रक्षक दल व नौदलाने मिळून शोध मोहिमेस सुरुवात केल्याची माहिती श्री डांगी यांनी देऊन यासाठी नौदलातर्फे दोन व किनारा रक्षक दलातर्फे एक हेलिकॉप्टर उत्तर गोव्यातील किनारी भागामध्ये पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे सहा तास संकटात असलेल्या नौकांचा शोध घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदर शोध मोहिमेच्या दरम्यान नौदलाला खोल समुद्रामध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या नौकांवरून प्रथम सात खलाशी व एका अल्पवयीन मुलाला वाचविण्यात यश आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. संकटामध्ये असलेल्या गोव्यातील नौकांना मदत करण्यासाठी एक जहाज कर्नाटक व दक्षिण गोवा किनारपट्टीच्या भागामध्ये तैनात करण्यात आले होते अशी माहिती श्री.डांगी यांनी यावेळी देऊन दुसरे जहाज उत्तर गोवा व दक्षिण महाराष्ट्र भागामध्ये ठेवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आज पहाटे ५.३० च्या सुमारास तटरक्षक दलाच्या "संग्राम' नावाच्या जहाजाला गोव्यातील अन्य एका मच्छीमार नौकेला शोधण्यात यश आल्याचे डांगी यांनी सांगितले. त्यावर असलेल्या सहा जणांना सुखरूपरीत्या किनाऱ्यावर आणण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले. "जीवन-१' असे या नौकेचे नाव असल्याची माहिती श्री. डांगी यांनी देऊन ती रत्नागिरी भागाच्या समुद्रामध्ये बुडत होती व यावेळी "संग्राम' जहाजावरील तटरक्षक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून या चार जणांना वाचवल्याचे ते यावेळी म्हणाले. सदर नौकेवर एकूण २९ खलाशी असल्याची माहिती उपलब्ध झाल्याचे श्री.डांगी यांनी यावेळी सांगितले. त्या खलाशांबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळाली नसल्याचे ते यावेळी म्हणाले.
गोव्यापासून १४० सागरी मैल अंतरावरून चक्रीवादल ११ नोव्हेंबर रोजी पहाटे पोहोचले होते. यावेळी जोरदार वारे वाहत होते आणि समुद्र खवळला होता. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा भारतीय तटरक्षक दलाकडून मच्छीमार संचालनालयामार्फत देण्यात आला होता. ११ नोव्हेंबरच्या सकाळी अनेक होड्या समुद्रात अडकून पडल्याचे वृत्त तटरक्षक दलाला मिळाले, यानंतर दुपारी ३३ होड्या आणि त्यावरील खलाशी वादळात सापडल्याचे निश्चित झाले. त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्यात येत होता. या होड्यांवरील खलाशी भ्रमणध्वनीद्वारे आपल्या मालकांच्या संपर्कात होते. ११ रोजी दुपारपर्यंत भरकटलेल्या बहुतेक होड्यांनी महाराष्ट्रातील लहानसहान बंदरांवर आश्रय घेतला, अशी माहिती किनारा रक्षक दलाने दिली आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास "एनर्फोड' नावाच्या अन्य एका नौकेचा शोध लावण्यात तटरक्षक दलाच्या जहाजाला यश आल्याची माहिती श्री. डांगी यांनी यावेळी देऊन चार खलाशांना वाचवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. उपलब्ध माहितीनुसार गोव्यातील आणखीन चार नौका अद्याप बेपत्ता असल्याची माहिती श्री. डांगी यांनी देऊन सुमारे ३६ खलाशांचा जीव धोक्यात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा शोध चालू असल्याची माहिती त्यांनी दिली. जो पर्यंत बेपत्ता असलेल्या बाबत पूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत ही शोध मोहीम चालूच राहणार असे श्री. डांगी यांनी शेवटी सांगितले.

No comments: