Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 9 November, 2009

अमोनिया गळतीच्या वृत्ताने दक्षिण गोव्यात हलकल्लोळ

उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली माहिती केवळ मॉकड्रिल!
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): झुआरी ऍग्रो केमिकल फॅक्टरीतून अमोनियाची गळती लागल्याचे वृत्त एक खासगी वृत्तसंदेश पाठवणारी संस्था आणि एफएम रेडिओवर आज दुपारी प्रसारित झाल्याने दक्षिण गोव्यात एकच हल्लकल्लोळ माजला. लोकांमध्ये घबराट निर्माण होऊन, आपल्या नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या काळजीने वेढलेल्यांनी सदर कंपनीच्या आवारात एकच गोंधळ घातला. आपत्कालीन सेवेची कृत्रिम तालीम म्हणून हा संदेश एका खासगी फोन एसएमएसद्वारे वृत्त पुरवणाऱ्या संस्थेद्वारे प्रसारित करण्यात आला होता. संदेशात असे म्हटले होते की झुआरी ऍग्रो केमिकलच्या फॅक्टरीतून अमोनिया गॅसची गळती सुरू झाली असून, ही गळती चालूच राहिली आहे. वायू वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये स्थलांतरित करताना सदर घटना घडल्याचे सांगण्यात आले. तर या वायुगळतीचा परिणाम झालेल्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात स्थलांतरित करण्यात आल्याचे संदेशात स्पष्ट करण्यात आले होते. हे वृत्त कळताच एकच गोंधळ निर्माण झाला. झुआरी ऍग्रो केमिकल फॅक्टरी झुआरी नगरच्या झोपडपट्टीजवळच असून, दाबोळी विमानतळ, मुरगाव पोर्ट ट्रस्ट हे भागही या फॅक्टरीपासून विशेष लांब नाहीत. एका मित्राकडून हे वृत्त कळताच मी वेर्णातील माझ्या नातेवाइकांना त्वरित फोन लावला. भीतीने आमची पुरती गाळण उडाली. काय करावे? कसे करावे ते कळेनासे झाले. सर्वत्र एकच गोंधळ उडाला होता, असे वास्कोत वास्तव्य करून असलेल्या विवेक नाईक यांनी सांगितले.
विभागीय अधिकारी लेविन्सन मार्टिन्स यांनी सांगितल्याप्रमाणे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट (एनडीएसए)नुसार त्यांनी केवळ कायद्याचे पालन करत आपण एसएमएस सेवेला आणि एफएम रेडिओला याबाबत सुचित्त केले. स्थलांतर करताना एखादी घटना घडू नये म्हणून त्याविषयी लोकांना सावध करणे हे आमचे कर्तव्य होते. २०० लोकांना इस्पितळात दाखल करणे हा केवळ सरावाचा भाग होता. सर्व ठिकाणचे अग्निशमन दलाचे जवानही याठिकाणी एकत्र झाले होते, असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांनी सांगितल्याप्रमाणे लोकांना शांतता पाळण्याचे आणि तो एक कृत्रिम स्थिती असेल हे स्पष्ट करणारे दुसरे वृत्त लगेच प्रसारित करण्यात आले होते. ते केवळ शोधकाम होते, धोक्याची घंटा वाजवण्यासारखे काही नसून, त्यामुळे लोकांनी घाबरून न जाण्याचे आवाहनही करण्यात आले. मात्र ते वृत्त लोकांना मिळाले नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सरकारवर ताशेरे ओढत आपल्या वृत्तसंस्थेचा अशाप्रकारे गैरवापर करून एका कृत्रिम घटनेसाठी अशाप्रकारे वृत्तसंस्थेचा वापर करणे किळसवाणा प्रकार असल्याचे एसएसएम सेवा पुरविणाऱ्या व्यक्तीने सांगितले. कृत्रिम तालीम ठरावीक स्तरापर्यंत मर्यादित ठेवली गेली पाहिजे असेही त्याने यावेळी सांगितले. हा केवळ "लांडगा आला रे आला...' असा प्रकार असून ज्यावेळी खरोखरच अशा प्रकारची एखादी घटना घडेल त्यावेळी कदाचित लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे यावर त्वरित कारवाई होण्याची आवश्यकता लोकांनी व्यक्त केली आहे.

No comments: