पणजी, दि. १३ (प्रीतेश देसाई): ट्रॉलर चक्रीवादळात सापडल्यानंतर २९ पैकी आम्ही केवळ सात जण वर आलो होतो. त्यावेळी २३ वर्षीय रोहिदासही आमच्या बरोबरच होता. पण काही तासांत आम्ही त्याचा मृत्यू समोर होताना पाहिला, असे २३ तास पाण्यात तग धरुन सुखरूप परत आलेल्या "जीवन १' नौकेवरील विनोद चौडू यांनेअश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी सांगितले. हे सहाही खलाशी मृत्यूच्या जबड्यातून चक्रीवादळाचा सामना करून परतले आहेत. या सहा पैकी एकाची तब्येत आज दुपारी अधिक बिघडल्याने त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
आम्ही दि. ८ नोव्हेंबर रोजी मालीम जेटीवरून सुटल्यानंतर दि. ११ रोजी सकाळी ८ वाजता रत्नागिरीतील जयगडच्या समुद्राच्या आत जाण्यासाठी निघालो होतो. पुढे आमच्या नशिबात काय होते याची पुसटशीही आम्हाला कल्पना नव्हती. "जीवन १' या नौकेत आम्ही मुख्य तांडेलासह २९ जण होतो. समुद्र बराच खवळलेला होता. सकाळी ९ वाजता अचानक चारही बाजूने तुफान वाऱ्यासह एकच लाट उसळली आणि आमची नौका पलटी झाली. आम्ही सात जण कसे बसे वर आलो. चारही बाजूने समुद्रातील पाण्याशिवाय काहीच दिसत नव्हते. तेवढ्यात आम्हाला जाळ्यांना बांधण्यात येणारे छोटे छोटे "प्लॅस्टिकचे बॉल' आमच्या हाताला लागले. ते आम्ही दोन - दोन बॉल दोन्ही खाकेत घालून सुमारे २३ तास पाण्यात तरंगत थांबलो, असे विनोद याने पुढे सांगितले.
सकाळी ९ वाजता ही दुर्घटना घडली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे एक बोट बऱ्याच लांबून येत असल्याचे दिसताच नसलेला जोर एकवटून जोरात शिट्टी वाजवली. त्याबरोबर त्या बोटीच्या कॅप्टनने आमच्या दिशेने प्रकाशाचा झोत टाकला. हळूहळू ती बोट आमच्या दिशेने आली. त्यांनी आम्हाला पूर्ण एक फेरी घातल्यानंतर सकाळी सहा वाजता आमच्या एकदम जवळ आली आणि आम्हांस सहा जणांना त्यांनी वर काढले. मुंबई येथून आलेली ही किनारा रक्षक दलाची बोट होती. त्यांनी आम्हाला वास्को येथे आणून सोडले. मात्र, ट्रॉलरवरून परत येईपर्यंत रोहिदास आणि आमच्या ट्रॉलरवरील अन्य २३ जण शेवटपर्यंत आम्हाला दिसले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
या ट्रॉलरमधे असलेल्या साहाय्यक तांडेल विनोद चौडू (३२ राहणारा कुंमठा) यांच्यासह गोविंद किप्पया आंबीक (२४ राहणारा कुंमठा), दिनेश प्रधान (२२ राहणारा छत्तीसगड), जितेंद्र साई (२० छत्तीसगड), भास्कर सुब्राय आंबीक (२६ कुमठा) या सहा जणांनी जिवंत मृत्यू अनुभवला. तर, मृत पावलेल्याचे नाव रोहीदास राम आंबीक (२३ राहणारा कु मठा) असे असल्याचे विनोद यांने सांगितले.
--------------------------------------------------------------------
जहाजात असलेले बिनतारी संदेश यंत्र नेहमी सुरू असते. किनारा रक्षक दलाने किंवा सरकारच्या कोणत्याही यंत्रणेने आम्हाला चक्रीवादळाची पूर्वमाहिती बिनतारी संदेशाद्वारे दिली नाही. काही मिनिटांपूर्वी सुद्धा आम्हाला हा संदेश मिळाला असता तर आम्ही सर्व या चक्रीवादळाच्या तडाख्यातून वाचू शकलो असतो, असे विनोद यांनी सांगितले. मात्र ट्रॉलरच्या मालकाने या दुर्घटनेच्या दोन मिनिटांपूर्वी मोबाइलवर संपर्क साधून परत येण्यास सांगितले होते. त्याला उत्तर देऊन मोबाईल बंद करण्याच्यावेळीच आम्हाला चक्रीवादळाने वेढले.
Saturday 14 November, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment