Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 12 November, 2009

'इफ्फी'च्या 'जलशा'ला दिग्गजांचा ठेंगा!

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): हिंदी सिने जगतातील चॉकलेट हिरो देव आनंद यांचा अपवाद नव्या जमानातील हिंदी तारेतारकांबरोबरच "ट्वेंटी ट्वेंटी' भारतीय चित्रपट स्पर्धेच्या दिग्दर्शक व टीकाकारांच्या परीक्षक मंडळावरील अनेक सदस्यांनीही "इफ्फी'च्या बहुचर्चित "जलशा'कडे पाठ फिरविल्याने आयोजकांवर हिरमुसले होऊन आज गोव्यात परतण्याची पाळी आली. गोवा मनोरंजन संस्थेने मुंबई येथे "बॉलिवूड'च्या तारे तारकांसाठी काल रात्री आयोजिलेला "जलसा' कार्यक्रम हा दिग्गज तारेतारका, दिग्दर्शक, निर्मात्यांच्या अनुपस्थितीमुळे फारसा रंगला नाही.
गोव्यात येत्या २३ नोव्हेंबरपासून होऊ घातलेल्या दहा दिवसांच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी बॉलिवूडच्या तारे-तारकांना निमंत्रण देण्यासाठी मनोरंजन संस्थेने या जलशाचे मुंबईत आयोजन केले होते. जुहूतील हॉटेल "जे डब्ल्यू मेरियट'मधील "सॉल्ट लेक' पूलवर हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला हिंदी चित्रसृष्टीतील नामांकित तारेतारका हजेरी लावतील अशी अपेक्षा होती; कारण बहुसंख्य तारे तारका, दिग्दर्शक, निर्माते इत्यादींना या कार्यक्रमाची निमंत्रणे देण्यात आली होती.
या जलशात "वीस वीस भारतीय चित्रपट' स्पर्धेचा शुभारंभ सन्माननीय अतिथी देवानंद यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे प्रमुख पाहुणे होते. मनोरंजन संस्थेने नेमलेल्या "कन्सेप्ट' या जनसंपर्क कंपनीच्या अधिकारी पूजा चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्वेंटी ट्वेंटी भारतीय चित्रपटांच्या दिग्दर्शकांच्या परीक्षक मंडळावरील मधूर भांडारकर, राहुल ढोलकीया, विशाल भारद्वाज यांच्यासह टीकाकारांच्या परीक्षक मंडळावरील अनुपमा चोप्रा या जलशा कार्यक्रमाकडे फिरकल्याच नाहीत. दिग्दर्शक मंडळावरील गजेंद्र अहिरे यांच्याबाबत विचारणा केली असता त्या कोणतीही ठोस माहिती देऊ शकल्या नाहीत.
उपलब्ध माहितीनुसार अहिरे हे दिग्दर्शकांच्या परीक्षक मंडळाचे सदस्य असूनही या कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत. ज्या निमंत्रितांची या कार्यक्रमाला हजेरी लागली त्यात अभिनेत्री दिव्या दत्ता, विनोदी अभिनेता जगदीप, खलनायक रणजीत यांच्यासह स्मिता वसिष्ठ, दिग्दर्शकांमध्ये अनंत महादेवन, जगमोहन, टिनू आनंद, नागेश कुकनूर, रितूपर्णा घोष, अंजन श्रीवास्तव व तसेच अन्वर अली आदींचा समावेश होता.
गोव्यातून या जलशासाठी गेलेल्या मनोरंजन संस्थेच्या शिष्टमंडळात स्वतः संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री दिगंबर कामत, मुख्य सचिव संजीव श्रीवास्तव, आमदार चंद्रकांत कवळेकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव, पत्रकार राजू नायक, मांगिरिश पै रायकर, राजेंद्र तालक, विशाल पै काकोडे आदींचा समावेश होता. अखेर या साऱ्या मंडळींनी मुंबईत पंचतारांकित सुविधांचा उपभोग घेतला व नंतरच ती गोव्याकडे परतली. त्यामुळे हाही येथे चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, मनोरंजन संस्थेचे कार्यकारिणी सदस्य मांगिरीश पै रायकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कालचा कार्यक्रम हा केवळ वीस भारतीय चित्रपट स्पर्धेचा शुभारंभ जाहीर करण्यासाठी आयोजित केला होता, अशी माहिती दिली. या स्पर्धेत संकेतस्थळावर शंभरेक भारतीय चित्रपटांची यादी घालण्यात आली असून तेथे लोकांचा मिळणारा प्रतिसाद व परिक्षक मंडळाचा निर्णय यातून सर्वोत्तम वीस भारतीय चित्रपट निवडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments: