Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 13 November, 2009

५२ शिक्षकांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): त्या "५२' शिक्षकांना भरती करून घेणाऱ्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल झाली आहे. सदर याचिका आज सुनावणीसाठी आली असता यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत या सर्व "५२' शिक्षकांचे भवितव्य याचिकेच्या अंतिम निवाड्यावर अवलंबून राहणार असल्याचा आदेश यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. मात्र सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्याची याचिकादाराची मागणी यावेळी खंडपीठाने फेटाळून लावली. ही निवड यादी रद्द करून पुन्हा नव्याने या जागांसाठी अर्ज मागवण्यात यावे तसेच सरकारच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती द्यावी, अशी याचना याचिकादाराने आपल्या याचिकेत केली आहे.
उपोषणाचे दबाव तंत्र वापरून आणि कायदा खात्याने ही प्रक्रिया बेकायदा असल्याचे मत केलेले असतानाही या शिक्षकांची भरती केली असल्याचा दावा याचिकादार अल्दिना आंतेनियो हेन्रीकेता लोबो यांनी आपल्या याचिकेत केली आहे. यात त्यांनी राज्य सरकार, शिक्षण खाते तसेच गोवा लोक सेवा आयोगाला प्रतिवादी करून घेतले आहे. सदर याचिकादार हा या पदासाठी घेतलेल्या मुलाखतीत नापास झालेला आहे, याची माहिती त्याला यापूर्वी मिळाली होती. तरीही त्याने या ५२ शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर त्या निर्णयाला आव्हान दिले असल्याने सदर याचिका दाखल करून घेऊ नये, असा युक्तिवाद यावेळी आयोगाच्या वकिलाने न्यायालयात केला.
दि. १२ जून रोजी शेवटची मुलाखत घेण्यात आली होती. त्यानंतर २७ ऑक्टोबर पासून मुलाखतीनंतर निवड झालेले उमेदवार उपोषणाला बसले. त्यावेळी कायदा खात्यातर्फे ऍडव्होकेट जनरल यांनी ही भरती योग्य नसल्याचे मत व्यक्त केले होते, असे याचिकादाराने म्हटले आहे.
लोक सेवा आयोगाने तोंडी परीक्षेला ६५ टक्के गुण मिळाले त्यांचीच निवड केली आहे. परंतु, लेखी परीक्षेत ज्यांना चांगले गुण मिळाले आहेत, त्याचे गुण ग्राह्य धरण्यात आलेले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
दि. ५ नोव्हेंबर रोजी सरकारने या "५२" शिक्षकांना नियुक्त करण्यासाठी घेतलेला निर्णय हा पूर्णपणे चुकीचा आणि घटनाबाह्य आहे तसेच लोक सेवा आयोगाने कोणतीही लेखी परीक्षा न घेता त्यांची निवड यादी जाहीर केली आहे.उमेदवारांना शैक्षणिक परीक्षांत मिळालेल्या गुणातील केवळ ३५ टक्के गुण ग्रहीत धरले आहेत. तर, ६५ टक्के गुण हे तोंडी परीक्षेत मिळालेले ग्राह्य धरले आहे, अशी माहिती याचिकेत देण्यात आली आहे.

No comments: