Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 14 November, 2009

धोक्याचा इशारा २४ तासांनंतर वितरित!

तर अनेक खलाशी वाचले असते...
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): नैसर्गिक आपत्तीकाळातजीवित व मालमत्तेची हानी कमीतकमी व्हावी या उद्देशाने राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाची रचना करण्यात आली. पण या प्राधिकरणाची सरकारी मानसिकता या प्राधिकरणाच्या मुळावरच आली आहे. परवा राज्यातील किनारी भागाला "फयान' वादळाने जो तडाखा दिला त्याबाबत हवामान खात्याने राज्य सरकारी यंत्रणेला पहिला सतर्कतेचा संदेश दिल्यानंतर तब्बल २४ तासानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आणि हा संदेश वितरित झाला,अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी प्राप्त झालेल्या खात्रीलायक वृत्तानुसार अरबी समुद्रातील या संभावित वादळाबाबतची पूर्वसूचना हवामान खात्याने दिली होती पण ही माहिती तात्काळ मच्छीमार लोकांना देण्यास सरकारी यंत्रणांकडून झालेली दिरंगाई अनेक खलाशांंच्या जिवावर बेतण्यास कारणीभूत ठरली. मांडवी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष आल्फोन्सो यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. संभावित हवामानातील बदलाची माहिती योग्य वेळी मिळाली असती तर त्याबाबत बिनतारी संदेशाव्दारे खोल समुद्रात असलेल्या खलाशांना सतर्क करता आले असते. त्यांना तात्काळ तेथील कुठेही एका काठावर सुरक्षितस्थळी आसरा घेण्याची सूचना देता येणे शक्य होते,अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
हवामान खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी संभावित वादळाच्या शक्यतेची वार्ता सर्व संबंधित सरकारी खात्यांना व मुख्य सचिवांना ९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता दिली होती. हा संदेश ७ वाजता पोहचूनही सरकारी यंत्रणा मात्र तातडीने कामाला लागण्यात अपयशी ठरली. हवामान खात्याने सतर्कतेचा आदेश देणारा संदेश रेडियोव्दारे दुसऱ्यादिवशी १० रोजी सकाळी ७ वाजता प्रसारित केला. दुसऱ्या बाजूने किनारा रक्षक दलाकडूनही राज्य सरकारी यंत्रणांना या हवामानातील बदलाची पूर्वसूचना ९ रोजी रात्री १० वाजता दिल्याची खबर मिळाली आहे.त्यानंतर हवामान खात्याने हा संदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना रात्री २ वाजता दिला. जेव्हा प्रत्यक्षात मच्छीमार खात्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी याबाबतची माहिती मच्छीमारांना देण्यासाठी तब्बल २४ तासांचा अवधी लागल्याचेही स्पष्ट झाले आहे. दक्षिण गोव्यात "मॉकड्रील' च्या नावाखाली सरकारी यंत्रणांकडून खाजगी प्रसारमाध्यमांचा वापर करून घेतल्याने एकीकडे टीका होत असताना आता प्रत्यक्षात आपत्ती ओढवली असता याच प्रसारमाध्यमांची तात्काळ मदत घेऊन मच्छीमार लोकांना सतर्क करण्याचे भान मात्र या अधिकाऱ्यांना राहिले नाही व यामुळेच ते टीकेचे लक्ष्य बनले आहेत. या काळात मुख्यमंत्री दिगंबर कामत राज्यात नव्हते. ते दिल्लीत होते व तिथून ते १० रोजी थेट मुंबई येथे गेले. मुख्य सचिव संजय श्रीवास्तव हे देखील १० रोजी मुंबईला रवाना झाले. राज्यातील आपत्कालीन यंत्रणेला खऱ्या अर्थाने सतर्कता बाळगण्याची गरज होती व त्यावेळी मुख्यमंत्री व मुख्य सचिव मुंबई येथे "इफ्फी' निमित्ताने आयोजित केलेल्या "जलसा'कार्यक्रमात व्यस्त होते.एकीकडे प्रशासकीय सेवेचे प्रमुख तर दुसरीकडे लोकनियुक्त सरकारचे प्रमुख दोघेही राज्याबाहेर होते व इथे मात्र प्रशासकीय यंत्रणा आपल्या नेहमीच्या बिनधास्त आविर्भावातच वागत होती. सरकारने वेळीच उपाययोजना हाती घेतली असती तर नक्कीच या वादळात वाहून गेलेल्या काही खलाशांचा तरी प्राण वाचवता आला असता.

No comments: