Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 10 November, 2009

गोव्यात येणारे तिळारीचे पाणी अडविण्याचा इशारा

बेरोजगार संघर्ष समिती आक्रमक
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): उत्तर गोव्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून तिळारीच्या पाण्याचा वापर करण्याची भाषा सुरू असतानाच तिकडे महाराष्ट्रात तिळारी धरणग्रस्त बेरोजगारांनी महाराष्ट्र सरकारविरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकून तिळारी धरणाचे गोव्यात येणारे पाणी अडवण्याचा इशारा दिला आहे. तिळारी धरणग्रस्तांना सरकारी नोकऱ्यांत प्राधान्य देण्याचे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने दिले होते पण त्याची पूर्तता न झाल्याने याठिकाणी आमरण उपोषण करणार असल्याचा निर्धारही या लोकांनी केला आहे.
तिळारी धरणग्रस्त बेरोजगार संघर्ष समितीने आयनोडे येथील मंदिराच्या प्रांगणात घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. समितीचे सचिव संजय नाईक यांनी "गोवादूत' शी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली. तिळारी प्रकल्पामुळे येथील एकूण आठ गाव पाण्याखाली आले. या गावातील विस्थापित लोकांना दिलेल्या आश्वासनांबाबत मात्र सरकार मूग गिळून गप्प असल्याची टीका श्री.नाईक यांनी केली. या प्रकल्पाला आता ३० ते ३२ वर्षे झाली व लोकांच्या दोन पिढ्या संपल्या. सुमारे १२०० कुटुंबीयांचे स्थलांतर सरकारने केले व प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला पूर्णपणे हरताळ फासण्यात आल्याचा ठपकाही श्री.नाईक यांनी ठेवला. यासंबंधी औरंगाबाद न्यायालयाच्या खंडपीठाने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला आदेश देऊनही त्याची पूर्तता होत नसल्याची खंत या लोकांनी व्यक्त केली आहे. या आदेशाची पूर्तता करण्यासाठी ३० सप्टेंबर २००९ ची तारीख देण्यात आली होती व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून नोकऱ्यांबाबत काहीही प्रयत्न केले नाहीत,अशी तक्रारही या लोकांनी केली आहे. दरम्यान,आता शेवटचा प्रयत्न म्हणून समितीतर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री,आमदार दीपक केसरकर आदींची भेट घेणार असून त्यांच्याकडून ठोस आश्वासन मिळाले नाही तर या प्रकल्पाव्दारे गोव्याला होणारा पाणीपुरवठा अडवून आमरण उपोषणाला बसणार असे संकेतही धरणग्रस्तांनी दिले आहेत.

No comments: